हवा हवाई !

हवा हवाई !

पुणे - देशांतर्गत विमान वाहतुकीत पुणे शहराने मोठी मजल मारली असून, देशात १७ मार्गांपैकी दिल्ली-पुणे-दिल्ली मार्ग सहाव्या क्रमांकावर पोचला आहे. गेल्या दहा वर्षांत या मार्गावरील प्रवासी संख्या तिपटीहून अधिक वाढली आहे. विविध क्षेत्रांत पुण्याचा वाढत असलेला लौकिक आणि येथील पायाभूत सुधारणांमध्ये होत असलेली वाढ, यामुळे पुण्यातून प्रवाशांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे  निरीक्षण आहे.

विमान वाहतूक मंत्रालयाला संशोधनात मदत करणाऱ्या एका संस्थेने देशातील प्रमुख १७ विमान मार्गांचा आढावा नुकताच सादर केला आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये दिल्ली-पुणे-दिल्ली हा मार्ग दर वर्षी वाढणाऱ्या प्रवासी संख्येनुसार १७ पैकी १५व्या क्रमांकावर होता. मात्र २०१७ मध्ये हा मार्ग देशात सहाव्या क्रमांकावर पोचला आहे. तेव्हा ९ लाख २७ हजार दर वर्षी दिल्ली- पुणे- दिल्लीमार्गाचा वापर करीत, तर आता ही संख्या ३० लाख ३१ हजारांवर पोचली आहे. २०१४मध्ये पुण्यातून १७ लाख २६ हजार प्रवासी या मार्गाचा वापर करीत होते. गेल्या दहा वर्षांत पुण्यातून दिल्लीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची संख्या तिप्पट झाली आहे. त्यामुळे पुण्याचा देशात आता ६वा क्रमांक झाला आहे. 

देशात कोलकता, पुणे, अहमदाबाद, लखनौ आणि हैदराबाद या शहरांशी दिल्लीशी ‘कनेक्‍टिव्हिटी’ वाढल्याचेही निरीक्षण हवाई मंत्रालयाला सादर झालेल्या अहवालात म्हटले आहे. देशातील या १७ मार्गांवर २००७मध्ये दर वर्षी सुमारे ४ कोटी प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, आता ही संख्या ११ कोटींपेक्षा जास्त झाली असल्याचेही त्यात म्हटले आहे.

पुण्यातून या पूर्वी राजकीय आणि प्रशासकीय कारणासाठी दिल्ली वाऱ्या होत. परंतु आता उत्पादन, आयटी, सेवा क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या पुण्यात पोचल्या आहेत. आरोग्य, पर्यटन आदी क्षेत्रांसाठीही पुण्यात वाढत्या संख्येने परदेशी पर्यटक येत आहेत. पुण्याजवळची तीर्थक्षेत्रेही उत्तर भारतातील 

नागरिकांना आकर्षित करीत आहेत. तसेच, दिल्लीतून दक्षिण भारतात जाण्यापूर्वी पुण्यात येऊन जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढती असल्याचेही तज्ज्ञांचे  म्हणणे आहे. 

पुण्यात केंद्रीय आणि संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची कार्यालये, संशोधन संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच उत्पादन, माहिती तंत्रज्ञान आणि सेवाक्षेत्रही शहरात गेल्या दहा वर्षांत विस्तारले आहे. दिल्लीमार्गे येऊन पुण्यातून पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्या पर्यटकांचीही संख्या वाढती आहे. परदेशात जाण्यासाठीही मुंबईमार्गे जाण्याऐवजी पुण्यातून बॅगा ‘चेक इन’ करून दिल्लीमार्गे जाण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे पुण्याची पसंती वाढू लागली आहे. त्यामुळेच पुणे-दिल्ली मार्गाची प्रवासी संख्या तिप्पट झाली आहे. 
-धैर्यशील वंडेकर,  हवाई वाहतूक  तज्ज्ञ-विश्‍लेषक

पुण्याचे महत्त्व गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पूर्वी महाराष्ट्रात केवळ मुंबई ये-जा करण्याचा प्रघात होता. आता पुणे हे जगाच्या नकाशावर पोचले आहे. उत्पादन, सेवाक्षेत्राबरोबरच शिक्षण, आरोग्य आदींसाठी पुण्याचा लौकिक वाढला आहे. पायाभूत सुविधा वाढल्यामुळे येथील उद्योग-विश्‍व वाढत आहे. त्यातूनच दिल्ली- पुणे- दिल्ली मार्गावरील प्रवासी संख्या वाढती असून, येत्या काही काळात ती आणखी वाढू शकते. 
-अनंत सरदेशमुख,  महासंचालक, एमसीसीआयए

२७ विमानांचे  दररोज उड्डाण
दिल्लीहून दररोज सरासरी २७ विमाने पुण्यात येतात आणि तेवढीच विमाने उड्डाण करतात. सुट्यांच्या कालावधीत ही संख्या वाढते. दिल्लीसाठी एअर इंडिया, स्पाइस जेट, जेट एअरवेज, इंडिगो, एअर एशिया, गो एअर, विस्तारा या सात विमान कंपन्यांची सेवा सध्या सुरू आहे. त्यांच्यातील स्पर्धेमुळे २५०० रुपयांपासून तिकीट उपलब्ध आहे. अवघ्या दोन तासांत दिल्लीत पोचत असल्यामुळे प्रवाशांच्या त्यावर उड्या पडत आहेत. रेल्वेचे १००० ते १८०० रुपये तिकीट असून, प्रवासासाठी सुमारे २० ते २३ तास लागतात. लोहगाव विमानतळ हा हवाई दलाच्या अखत्यारीत 
आहे. त्यामुळे तेथील उड्डाणांना मर्यादा आहेत. परंतु नव्या विमानतळावरून दिल्लीसाठी उड्डाणांची संख्या दररोज ४५ ते ५० पर्यंत होऊ शकते, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com