वर्षभरात रेल्वे अपघातात 251 बळी 

वर्षभरात रेल्वे अपघातात 251 बळी 

पिंपरी - पुणे रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात रेल्वे अपघातात 251 जणांचे बळी गेल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी दिली. दरम्यान, रेल्वे गाड्यांचे वेग वाढविण्यात आले असून नागरिकांनी पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

पुणे रेल्वे पोलिसांची हद्द पूर्वेला लोणी तर पश्‍चिमेला लोणावळा-पळसदरीपर्यंत आहे. 251 रेल्वे अपघातांत आत्महत्या व लोहमार्ग ओलांडताना रेल्वेखाली सापडून मृत्यू पावणाऱ्यांचा समावेश आहे. स्थानकावर पादचारी पूल असूनही वेळ वाचवण्यासाठी व पायऱ्या चढण्याचा कंटाळा म्हणून अनेक जण लोहमार्ग ओलांडतात. त्याच दरम्यान रेल्वे आल्यास जीव गमावतात. अपघात टाळण्यासाठी रेल्वे कायद्यात उपाययोजना आहेत. परंतु प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. 

पिंपरीत चौकीच्या हद्दीत 70 बळी 
पिंपरी चौकीच्या हद्दीतील रेल्वे अपघातात वर्षभरात 70 बळी गेले आहेत, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. तर लोहमार्ग ओलांडताना पिंपरी स्थानकावर आठवड्यात दोन चिमुकल्यांसह सहा जणांनी प्राण गमावले आहेत. 

शॉर्टकट बेततोय जिवावर 
पिंपरी रेल्वे स्थानकावर रविवारी (ता. 12) सायंकाळी लोहमार्ग ओलांडताना अंजली रोडे यांच्यासह मुलगा प्रेम (वय 7) व मुलगी प्रिया (वय 10) यांचा कोयना एक्‍स्प्रेसखाली सापडून जागीच मृत्यू झाला. अंजली या बसने प्रवास केल्यानंतर बाजारात जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून लोहमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, लोकलच्या आडून येणाऱ्या कोयना एक्‍स्प्रेसखाली सापडून या माय-लेकरांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अनेकजण पादचारी पुलाचा वापर न करता लोहमार्ग ओलांडतात आणि जीव गमावतात. 

रेल्वे अपघातात 50 टक्केच प्रवासी 
रेल्वे अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये 50 टक्के जण रेल्वे प्रवासी असतात. स्थानक परिसरातील रहिवासीही मोठ्या प्रमाणात लोहमार्ग ओलांडतात. रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावलेल्या जाळ्याही तोडल्या जातात, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. 

*काय करायला हवे 
-रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही बसवावेत 
-दोन लोहमार्गाच्या मधोमध लोखंडी जाळ्या बसवण्याची गरज 
-विकलांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा करण्याची गरज 
-रेल्वे सुरक्षा दल व महाराष्ट्र रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे 
-रेल्वे व स्थानक परिसरात रेल्वे कायदा, अपराध व दंडाची माहिती असावी 
-अपघात टाळण्यासाठी जनजागृतीची गरज 
-लोहमार्ग ओलांडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी 
-पादचारी पुलावर थांबलेल्या रोमियोंचा बंदोबस्त करावा 

रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र रेल्वे पोलिसांकडून रेल्वे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. मात्र, वेळ वाचविण्यासाठी अनेकजण पादचारी पुलाचा वापर न करता लोहमार्ग ओलांडतात आणि प्राण गमावतात. 
- मनोज खंडाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रेल्वे पोलिस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com