पिंपरी - एखाद्या ठिकाणी उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीकडून शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन होणार असले, की त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. पण, शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या कंपन्यांची मालकी शेतकऱ्यांकडेच राहिली तर... त्यांना कायमस्वरूपी निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. या विचारातूनच माणमधील डॉ. यशराज पारखी यांनी "माण हायटेक सिटी' ही अनोखी योजना तयार करून ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिली आहे.
"माण हायटेक सिटी प्रकल्पा'त निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा तिन्ही प्रकारांचा समावेश शक्य आहे. त्यामुळे परिसर नावारूपाला येईल. प्रामुख्याने मोठ्या, मध्यम आणि छोट्या शेतकऱ्यांना उपक्रम फायदेशीर ठरेल. या उपक्रमाची माहिती काही शेतकऱ्यांना दिली आहे. काही जणांनी त्यात स्वारस्य दाखविले असल्याचे डॉ. पारखी यांनी सांगितले.
पाचशे एकरवर प्रकल्प शक्य
माण टप्पा चारमध्ये एक हजार 49 एकर क्षेत्र आहे. पैकी 50 एकर जागा ही शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी देण्याचे नियोजन आहे. उर्वरित 400 ते 500 एकर जागेवर "माण हायटेक सिटी प्रकल्प' राबवणे शक्य आहे.
असा असेल प्रकल्प
हिंजवडी आयटी पार्कच्या माण येथील टप्पा चारमध्ये सुमारे 400 एकर जागेवर "माण हायटेक सिटी' प्रकल्प राबवणे शक्य आहे. यात एमआयडीसी, शेतकरी आणि कंपन्या यांना एकत्र येणे शक्य होईल. या योजनेत 51 टक्के शेअर्स गुंतवणूकदारांचे, 49 टक्के शेअर्स शेतकऱ्यांचे असतील. यातून मिळणाऱ्या फायद्यातील हिस्सा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मिळणे शक्य होईल.
उद्योगासाठी जागेचे संपादन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतात. शेतकऱ्यांची ही स्थावर संपत्ती वडिलोपार्जित असते. त्याचे जतन करण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जागेवर उभ्या राहणाऱ्या कंपन्यांची मालकी त्यांच्याचकडे राहिली, तर त्यातून कायमस्वरूपी अर्थार्जनाचे साधन उपलब्ध होणार आहे.
- डॉ. यशराज पारखी, माण
|