पिंपरी - रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याच्या खून प्रकरणात महाकाली आणि सोन्या काळभोर टोळीचा हात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपींना मोका लावण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगवी येथील पत्रकार परिषदेत दिली.
रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा 20 नोव्हेंबर रोजी डोक्यात दगड घालून खून झाला होता. या प्रकरणात कुख्यात महाकाली टोळीचा हणम्या शिंदे आणि सोन्या काळभोर टोळीचा म्होरक्या सोन्या काळभोर याला अटक झाली आहे. आकुर्डी, रावेत परिसरात या दोन्ही टोळ्यांची दहशत आहे. यापूर्वी सोन्या काळभोर टोळीने भोसरीतील संतनगर भागात अनेक वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. त्या वेळी भोसरी पोलिसांनी सोन्या काळभोरसह 22 जणांना मोका लावला होता. मात्र, तांत्रिक कारण देत तो नंतर रद्द केला होता. त्यानंतर काळभोर टोळीचे गुन्हे अधिकच वाढले. वर्चस्वासाठी आता या टोळ्यांकडून खूनही केले जात आहेत.
अनिकेत जाधव खुनाच्या गुन्ह्यात मोका लावण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. यामुळे गुन्हेगारी टोळ्यांच्या गुन्ह्यांना आळा बसेल. मात्र, यापूर्वीचा मोका नेमक्या कोणत्या कारणामुळे रद्द झाला, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन
|