डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन आता विद्यार्थी दिवस

पिंपरी - जगात सर्वात आदर्श असलेल्या भारतीय संविधानाचे (घटना) शिल्पकार आणि करोडो वंचित,दलितांचे उद्धारकर्ते असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन (7 नोव्हेंबर)हा राज्य सरकारने विद्यार्थी म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. त्यामुळे हा दिवस या वर्षापासून दरवर्षी राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.

आदर्श नागरिक घडण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण विद्यार्थ्यांना होण्याकरिता डॉ.बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. डॉ. बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशदिनाचे महत्व आणि तो विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यामागील कारणमिमांसा यासंदर्भातील शासकीय आदेशात स्पष्ट करताना म्हटले आहे,की विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून आदर्श विद्यार्थी निर्माण होणे ही काळाजी गरज आहे.त्यासाठी शिक्षण हे उन्नतीचे एकमेव साधन आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण विद्यार्थ्यांना होण्यासाठी विद्यार्थी दिन साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात या दिवशी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर निबंध,वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात म्हणाल्या,7 नोव्हेंबर 1900 साली डॉ.बाबासाहेबांनी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. तेव्हा त्यांचे नाव भिवा होते.शाळेच्या रजिस्टरला 1914 क्रमाकांवर आजही बाल भिवाची स्वाक्षरी असून हा ऐतिहासिक दस्ताऐवज शाळेने आजही जपून ठेवला आहे.डॉ.बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची युगांतराची चाहूल असल्याने हा दिवस साजरा करण्याचा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 27 ऑक्टोबर रोजी घेतला.

यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात म्हणाल्या, डॉ.बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशाने ते सुशिक्षित आणि प्रज्ञावंत,तर झालेच शिवाय ते दलित,वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. संविधानाचे शिल्पकार ठरले.त्यामुळे देशात समता,बंधूता,न्याय ही मुल्ये रुजली.म्हणून डॉ. आंबेड़करांचा शाळा प्रवेशदिन ही अत्यंत महत्वाची आणि इतिहासाला कूस बदलायला लावणारी घटना ठरते.ते आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला विद्यार्थी व्यासंग शेवटपर्यंत जपला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com