'रेल्वेच्या जमिनींवरील जलस्रोत पुनरुज्जीवित करणार'

'रेल्वेच्या जमिनींवरील जलस्रोत पुनरुज्जीवित करणार'

पुणे  - ""आगामी काळात पाण्याचा प्रश्‍न अधिक भीषण रूप धारण करणार आहे. केवळ भावनेतून पाणीप्रश्‍न सुटणार नाही; तर त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शास्त्रशुद्ध उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. रेल्वेच्या मोकळ्या आणि वापरात नसलेल्या जमिनीवरील नैसर्गिक जलस्रोतांना पुनरुज्जीवित आणि काही ठिकाणी कृत्रिम जलस्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील,'' अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. 

महाराष्ट्र विकास केंद्रातर्फे प्रभू यांच्या हस्ते गुजरातचे माजी जलसंपदामंत्री डॉ. जय नारायण व्यास यांना "जलमित्र पुरस्कार' देण्यात आला, या वेळी प्रभू बोलत होते. जोधपूर येथील जल भागीरथी फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त पृथ्वीराज सिंग, वस्तू व सेवाकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर, केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील, पत्रकार राजा माने उपस्थित होते. 

प्रभू म्हणाले, ""हवामान बदलामुळे आजकाल "कधी येतो तोचि पावसाळा', "येईल तो पावसाळा' असे म्हणायची वेळ आली आहे. पारंपरिक ज्ञानाचा आधार घेऊन पाणीप्रश्‍न सोडवावा लागणार आहे. पाणी नसते त्या वेळी उपाययोजनांचा विचार केला जातो. पाऊस पडला, की पुन्हा त्या प्रश्‍नांचा विसर पडतो. पाणीप्रश्‍नांवरील उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. पाण्याचे संवर्धन करण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन गरजेचे आहे.'' 

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. व्यास म्हणाले, ""पाण्याचा प्रश्‍न भीषण होत असून, देशात गुजरातसह महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांत पाण्याचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर भर दिला पाहिजे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com