हजार तासांची घरातली शाळा...(हेरंब कुलकर्णी)

4dec2016-heramb
4dec2016-heramb

शिक्षण कायद्यानं प्राथमिक शाळा वर्षाला ८०० तास, तर माध्यमिक शाळा एक हजार तास चालते. इतका कमी काळ चालणाऱ्या शाळेचं आपण समाज, शासन, पालक म्हणून किती बारकाईनं मूल्यमापन करतो? आणि त्यांच्याकडून आपल्या अपेक्षाही कितीतरी असतात. ते करायलाही हरकत नाही; पण हजार तासांची दुसरी एक शाळा आपल्या घरातच भरत असते...पण त्या शाळेकडं पालक लक्ष देत नाहीत किंवा ‘दर्जा सुधारा’ म्हणून त्या शाळेशी भांडतही नाहीत. त्या शाळेकडून आपण अपेक्षाही करत नाही. कोणती आहे ती शाळा? ती शाळा आहे दूरदर्शन आणि सोशल मीडियाची...!

घरातली मुलं टीव्ही आणि सोशल मीडिया एका वर्षात एक हजार तासांपेक्षाही जास्त वेळ बघतात. म्हणजे शाळेत ते जेवढा वेळ असतात, तेवढाच वेळ ते या शाळेतही असतात आणि तरीही त्या शाळेत ती काय शिकतात याकडं पालक, समाज, शासन काळजीनं पाहत नाहीत. याउलट टीव्हीच्या विरोधात बोलणाऱ्यांना ‘फॅडिस्ट’ समजलं जातं. आम्ही आमच्या घरातला टीव्ही गेली तीन वर्षं बंद ठेवला आहे. त्याचा लाभ म्हणजे मुलांचं वाचन वाढलं, चित्र काढणं वाढलं, गंभीरपणे एखादा विषय समजून घेणं वाढलं. माझं स्वतःचं लेखन टीव्ही नसल्यानं वाढलं. ज्या विषयात आवड आहे ती माहिती मुलगा नेटवर बघतो.

बातम्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून समजल्यानं काही फरक पडत नाही. हे सगळं सकारात्मक परिमाण मी अनुभवत आहे; पण जेव्हा आमच्याकडं कुणी येतं आणि घरात टीव्ही नाही हे त्याला किंवा तिला कळतं, तेव्हा ते आमच्याकडं जणू काही दयेनंच पाहत असतात.

‘जगाच्या ज्ञानापासून मुलांना दूर ठेवू नका,’ असा उपदेशही करतात. तेव्हा या टीव्ही आणि सोशल मीडियाच्या अनौपचारिक शाळा खरंच जगाचं परिपूर्ण ज्ञान देतात का? पारंपरिक शाळा जशा विकासाच्या संधी मुलांना देतात, तशा संधी या शाळा देतात का? या गृहीतकाचीच उलटतपासणी करायला हवी.

टीव्हीनं आणि सोशल मीडियानं मुलांचं शारीरिक नुकसान जेवढं होतं, त्यापेक्षाही कितीतरी नुकसान हे मानसिक स्तरावरचं असतं. वेगवान हालचाली हिंसकतेशी जोडल्या गेल्यानं मुलांना मग हिंसक वृत्तीही आवडू लागते.  

भीती आणि हिंसा याबाबत त्यांची संवेदनशीलता कमी होत जाते आणि याचा त्यांच्या प्रत्यक्ष जीवनावरही परिणाम होतोच. माध्यमिक शाळेतली मुलांना एकट्यानं किंवा समवयीन मुलांबरोबर टीव्ही पाहायला आवडतं. स्वातंत्र्य, प्रणय हे विषय आवडतात. म्युझिक व्हिडिओज्‌, थरारपट इत्यादी पाहायला आवडतं. आपली मुलं टीव्ही आणि सोशल मीडियाच्या शाळेत शिकतात. यातून त्यांच्या भावनांकाची मोडतोड होते. हिंसाचार बघून संवेदना बोथट होतात. अपघात बघून ‘थंडपणे पुढं जाणारी पिढी’ घडते. ओरडणं, शिवीगाळ, प्रसंगी मारहाण हे स्वभावविशेष होतात. मध्यंतरी नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्‍यात लहान वर्गमित्रांनी आपल्याच मित्राचा केलेला खून हे बोलकं उदाहरण ठरावं. प्रेमप्रकरणं अगदी पाचवीच्या वर्गापासून सुरू होतात. गेल्या तीन वर्षात मुंबईत १५ वर्षांच्या आतल्या मुलींच्या गर्भपात करण्याच्या प्रयत्नांत १४४ टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे, तर १५ ते १९ वयोगटात गर्भपातात ४७ टक्के वाढ झाली आहे. या तपशिलाचा सहसंबंध या माध्यमांशी जोडायचा की नाही? ग्रामीण आणि आदिवासी भाग हाही याला अपवाद नाही. किंबहुना गरीब कुटुंबात ही एकमेव करमणूक व एकच खोली त्यामुळं तिथं मुलं जास्त टीव्ही बघतात. मोबाईल बघतात. या आभासी जगातली मूल्यव्यवस्था आणि जाहिरातीतल्या जगातली घरं, तिथली सुंदर, नटलेली आई, गाडी आपल्या वाट्याला का नाही, अशा विचारांतून एक वेगळाच न्यूनगंड मुलांमध्ये निर्माण होतो. संशोधनात असं आढळून आलं आहे की, टीव्ही जास्त पाहणाऱ्या मुलांमध्ये खेळाची आवड कमी होत जाते. ते लांब उडीदेखील मारू शकत नाहीत! नी अनेक तास टीव्ही पाहिल्यानं त्यांच्यात स्थूलपणाच्या तक्रारी वाढतात, त्यांच्या शरीरातल्या मांसपेशी कमजोर पडतात व त्यामुळं भविष्यात त्यांच्या प्रकृतीला गंभीर धोका उद्भवू शकतो. तासन्‌तास टीव्ही पाहिल्यास प्राणघातक पल्मनरी एम्बॉलिझम हा रोग होण्याची शक्‍यता असते. पल्मनरी एम्बॉलिझम म्हणजे हृदयाकडून फुफ्फुसाकडं रक्त वाहून नेणाऱ्या रोहिणी या मुख्य रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होतो...असे काही निष्कर्ष माँट्रियल विद्यापीठ व जस्टिन मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल यांच्या संयुक्त संशोधनातून पुढं आले आहेत.

यावर उपाय काय? आम्ही आमच्या घरचा टीव्ही जसा बंद ठेवला आहे हा एक उपाय आणि ते शक्‍य नसेल तर मुलांशीच चर्चा करून रोज एक तास टीव्ही पाहण्याचं वेळापत्रक ठरवावं. कार्यक्रम एकत्र पाहावेत. 

कार्यक्रम पाहिल्यावर मुलांशी चर्चा करावी. जाहिरातींचा पडणारा प्रभाव, खोटी जीवनमूल्यं यावर चर्चा करून त्यांना वास्तवाची जाणीव करून द्यावी. त्याचबरोबर पालकांनीही स्वतः सोशल मीडिया कमीत कमी वापरून मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये. उलट सुटीच्या दिवशी जास्त वेळ व रोज मुलांशी बोलणं, खेळणं, त्यांच्याबरोबर चित्र काढणं, गोष्टींची पुस्तकं वाचणं असं करायला हवं. मुलं पालकांचं अनुकरण करतात असतात. तेव्हा तुमच्या हातात पुस्तकं आली आणि घरात लहान मुलांसाठीची पुस्तकं असली तरच मुलं ती वाचतील. पालक टीव्हीसमोर आणि व्हॉट्‌सॲपवर असतील तर मुलंही साहजिकच तेच करणार...तेव्हा टीव्ही, सोशल मीडियाला समर्थ पर्याय पालकांनी दिले, तरच मुलं ‘घरातली हजार तासांच्या शाळे’पासून वाचू शकतील.

टीव्ही बंद अभियान
जळगाव इथल्या ‘कुतूहल फाउंडेशन’चे महेश गोरडे केवळ टीव्ही व सोशल मीडिया या विषयावर जागरूकता करण्याचं काम गेल्या १० वर्षांपासून करत आहेत. या समस्येबद्दल आतापर्यंत महाराष्ट्रात तीन लाख माहितीपत्रकांचं वाटप त्यांनी केलं. ४० हजारांहून अधिक मुलांचं सामूहिक समुपदेशन करण्यात आलं आहे. शेकडो व्याख्यानं, कार्यशाळा, चर्चासत्रं, विविध स्पर्धा, पालकसभा, शिक्षकसभा अशा विविध माध्यमांतून या विषयावर नियमित प्रबोधन गोरडे करत असतात. ‘टीव्ही बंद’ नव्हे, तर ‘टीव्ही शिस्त’ अशा पद्धतीनं ते हे अभियान राबवतात. टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्‌सॲप, फेसबुक या माध्यमांचा योग्य प्रमाणात वापर करून उपयोग करून घ्यावा. त्यांचा अतिवापर व चुकीचा वापर टाळावा, असं सांगणारं ‘या टीव्हीचं काय करायचं?’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. त्याला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी टीव्हीला केवळ विरोध न करता सकारात्मक पर्यायही दिला. मुलांचे छंदवर्ग सुरू केले. त्यात विज्ञानप्रकल्प, बौद्धिक खेळणी, सीडी, पुस्तकं, सहली यांसह उपक्रमकेंद्र ते चालवतात. 

२० सोनेरी वर्षं
महेश गोरडे सांगतात ः ‘‘रोज सरासरी ४ तास टीव्ही, व्हॉट्‌सॲप, फेसबुकचा वापर याप्रमाणे एका वर्षाला एक हजार ४६० तास, तर ६० वर्षांच्या आपल्या आयुष्यात ८७ हजार ६०० तास टीव्ही, व्हॉट्‌सॲप, फेसबुकसाठी खर्च होतो. १२ तासांचा कामाचा दिवस धरला तर आपण आयुष्यातली २० सोनेरी वर्षं टीव्ही, व्हॉट्‌सॲप, फेसबुकवर अक्षरशः वाया घालवतो. 

देशात मुलं (चार ते १४ वर्षे) दिवसाला सुमारे १७० मिनिटं (सुमारे तीन तास) टीव्ही बघतात.

शनिवारी-रविवारी आणखी जास्त म्हणजे २०० मिनिटं (सुमारे साडेतीन तास).
वय वर्षं चार ते नऊ या वयोगटातल्या मुलांमध्ये हेच प्रमाण अनुक्रमे १३० आणि २०० मिनिटं आहे.

संपूर्ण देशभरातली तीन कोटींहून अधिक मुलं (चार ते १४ वर्षं) रात्री दहानंतरही टीव्ही बघतात. रात्री दहानंतर एफ टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, चॅनल व्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, एम टीव्हीच्या प्रेक्षकांपैकी १३ टक्के, तर बिंदास चॅनेलच्या प्रेक्षकांपैकी तब्बल १७ टक्के प्रेक्षक हे १४ वर्षांखालील मुलं आहेत.
(‘व्हॉट्‌स ऑन इंडिया’चं सर्वेक्षण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com