सुपे परिसरातील पालावरची मुलं शाळेत

शिक्षण विभागाला खडबडून जाग; अधिकारी मुलांच्या शोधात
50 Children on board at school in Supe area Department of Education
50 Children on board at school in Supe area Department of Educationesakal

पारनेर - सुपे परिसरात पालांत राहणा-या व मोलमजुरी करून उपजीविका करणा-या समाजाची अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. याबाबत, ‘बाई, आम्हाला शाळेत येऊ द्या ना’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून शिक्षणव्यवस्थेचा पर्दाफाश केला होता. यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला.

गेल्या दोन दिवसांपासून येथील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील आठ शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख, अशी टीम परिसरातील पालांवर जाऊन शालाबाह्य मुलांचा शोध घेत आहे. त्यांना या शोधमोहिमेत सुमारे ५० मुले आढळून आली. यातील काहींची नावे हजेरीपत्रकावर आहेत. मात्र, त्यांनी अद्यापि शाळाच पाहिली नाही, हे वेगळेच वास्तव समोर आले.

सुपे येथे वाळवणे रस्ता, बसस्थानक चौक व औद्योगिक वसाहत या परिसरात मोठ्या प्रमाणावर मोलमजुरी किंवा भीक मागून उपजीविका भागविणारा, पालांत राहणारा मोठा समाज आहे. या शालाबाह्य मुलांचा शोध शिक्षण विभागाने सुरू केला आहे. सरकारने सहा ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मोफत व सक्तीचे केले. यात एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेण्याचे बंधन शिक्षण विभागावर आहे. मात्र, अनेकदा हा आदेश व बंधन फक्त कागदावरच राहते.

याबाबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी निळकंठ बोरुडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले, की आम्ही परीसरातील पालांत व मोलमजुरी करून बसस्थानक परिसरात राहणा-या मुलांचा शिक्षकांमार्फत शोध घेतला. त्यात 50 मुले आढळली. मात्र, त्यांतील 25 मुले शाळेत दाखल आहेत. ती रोज शाळेत येत नाहीत. या सर्वांना नियमित शाळेत दाखल करून रोज उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यांचे राहणीमान सुधारावे, यासाठीही प्रयत्न करणार आहोत. मुलांना शाळेत पाठविण्यास तयार आहोत. मुलांचे राहणीमान खराब असल्याने इतर मुले त्यांना सामावून घेत नाहीत. आता आम्हीच टापटीप ठेवून मुलांना शाळेत पाठवू, असे या पालातील प्रमुखाने सांगितले.

शाळा व शिक्षक वाचविण्याचे प्रयत्न

प्राथमिक शिक्षणाधिका-याने परिपत्रक काढून शिक्षण विभागाला, या मुलांना शोधून त्यांना शाळेत दाखल करण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांअभावी अनेकदा तुकड्या बंद होतात. परिणामी, शिक्षकही कमी होतात. काही ठिकाणी विद्यार्थी कमी झाल्याने शाळा बंद पडण्याची शक्यता असते. अशा शाळांतील शिक्षक व संस्थाचालकांनी या शालाबाह्य व पालांतील मुलांना कागदोपत्री दाखल करून शाळा व शिक्षक वाचविण्याचे प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com