अकोले : तालुक्याची भाग्यलक्ष्मी असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे गळीत सुरू झाले असून, ऊसतोडणी कामगार शेतकऱ्यांच्या बांधांवर, कारखाना स्थळावर स्थिरावू लागले आहेत. त्यांची मुलेबाळे, कोंबड्या, जनावरे यांचीही योग्य प्रकारे सोय करण्यात आली असून, कामगार कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे.
ऊसतोडणी मजुरांसाठी चितळवेढे शिवारात एक एकर जागेत झोपड्या उभारल्या आहेत. महिला व पुरुष तोडणीला, तर वृद्ध व लहान मुले झोपड्यांमध्ये व आवारात बसलेली असतात. सोबत आणलेल्या शेळ्या, कोंबड्या यांची राखण करतात.
कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार व संचालक वैभव पिचड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जास्तीत जास्त गळीत केल्यास "अगस्ती' स्वयंपूर्ण होईल, याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे कारखाना अधिकारी, कर्मचारी कामात व्यग्र आहेत.
या बाबत श्यामराव कांगुणे म्हणाले, ""ऊसतोड कामगार अकोल्यात काम करण्यास उत्साही, आनंदी असतात. आम्ही अनेक कारखाने पाहिले; पण "अगस्ती' आम्हाला खूप जीव लावतो. सुख-दुःखात आम्हाला मदत करतो. त्यामुळे गळीत संपूच नये, असे वाटते. सध्या ऊसउत्पादक शेतकरी ऊस कारखान्यात पाठविण्यासाठी बांधावर बसून आहे.
संपादन - अशोक निंबाळकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.