Rain : अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा निम्माच पाऊस; शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी

पावसाळ्यास जून महिन्यात सुरुवात झाली. मात्र, दोन महिन्यांत चार नक्षत्रांचा कालावधी संपला. अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही.
Weather
Weatheresakal

अहमदनगर - जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. उत्तर भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला असल्याने मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणांमध्ये पाणीसाठा चांगला झाला आहे. दक्षिण जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याची आणि पिकांची परिस्थिती गंभीर बनली आहे.

पावसाळ्यास जून महिन्यात सुरुवात झाली. मात्र, दोन महिन्यांत चार नक्षत्रांचा कालावधी संपला. अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांत सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी पाऊस आहे. संगमनेर, कोपरगाव, राहाता या तीन तालुक्यांमध्ये सरासरीच्या निम्म्यापेक्षा थोडा जास्त पाऊस झाला आहे.

ज्या तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्याठिकाणी पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची स्थिती गंभीर आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, बाजरी, कपाशी, सोयाबीन, भुईमूग, वाटाणा या पिकांचे उत्पादन घटणार आहे.

मागील वर्षी सरासरीच्या १३०.९ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे यावर्षी पर्जन्यमान निम्म्याने घटल्याचे स्पष्ट झाले असून, त्याचा परिणाम जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावर झाला आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठे असलेले मुळा धरण दरवर्षी १५ ऑगस्टपर्यंत भरते.

गेल्या दोन महिन्यांत मुळा धरणात ११ हजार ६९९ दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. यावर्षी ७८ टक्केच भरले आहे. मुळा धरणात नवीन पाण्याची आवकही मंदावलेली आहे. यावर्षी १५ ऑगस्टपर्यंत धरण भरण्याचा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसावरच आशा आहे.

मागील वर्षी मुळा धरणाचा पाणीसाठा २३ हजार ६१८ दशलक्ष घनफूट झाला होता, तर मुळा धरण ९१ टक्के भरले होते. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेच्या मुळा धरणावर जिल्ह्यातील शेती, औद्योगिकीकरण व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात १८१ मिलिमीटर (६८ टक्के) पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नगर- १९५, पारनेर -१७२, श्रीगोंदे- १८१, कर्जत-१९६, जामखेड-२००, शेवगाव- २१६, पाथर्डी २३७, नेवासे १८५, राहुरी-९४, संगमनेर-१०५, अकोले- २६६, कोपरगाव- १३०, श्रीरामपूर ११३, राहाता- १५९

पावसाळ्याचे उरले अवघे ३५ ते ४० दिवस

पावसाचा कालावधी जून, जुलै, ऑगस्ट अन् सप्टेबर महिन्याचा असतो. त्यामध्येही प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावल्यास पुढचा काळ चांगला जातो. त्यानंतर सप्टेबर महिन्यात परतीचा पाऊसही बऱ्यापैकी झाल्यास शेतकरी समाधानाही राहतो.

यंदा मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनने समाधानकारक हजेरी लावली नाही. आता पावसाचे ८० दिवस संपले असून, अवघे ३५ ते ४० दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com