अहमदनगर : संविधानाच्या शिक्षणाने समाजाला दिशा मिळेल

भारत सासणे; नारीशक्ती, उत्कृष्ट शाळा पुरस्कार वितरण
constitution of india
constitution of indiagoogle

अहमदनगर : काळाने आपल्याला विविध कालखंडांत फिरवून आणले आहे. सध्या आपण भ्रम युगात असून, काळ आपला सोंगट्यांचा खेळ पाहात आहे. या भ्रम युगात सर्वसामान्यांचा आवाज हरवला आहे. त्यासाठी शाळांमधून संविधानाचे शिक्षण मिळाले तरच समाजाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

गुरुकुल महिला आघाडी व प्राथमिक शिक्षक समितीच्या संयुक्त विद्यमाने गुरुकुल नारीशक्ती व उत्कृष्ट शाळा पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास मीना सासणे, विद्यापीठाचे संशोधन प्रमुख डॉ. सुधाकर शेलार, कवी प्रशांत मोरे, राजेश्‍वर शेळके, शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, रा. या. औटी, गुरुकुलचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे, महिला जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग, सुलोचना पटारे, वृषाली कडलग, सुदर्शन शिंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शंभर महिला शिक्षकांचा नारीशक्ती, तर २५ शाळांचा उत्कृष्ट शाळा पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.

संविधान ही भवितव्याची किल्ली असून, ही किल्ली शिक्षकांच्या हातात आहे. शिक्षक मशाल हाती घेऊन समाजाला दिशा दाखवण्याचे काम करतात. सत्य सांगण्याची भूमिका त्यांनी पार पाडली पाहिजे, असे आवाहन सासणे यांनी केले. आमदार राजळे म्हणाल्या, नारीशक्ती पुरस्काराने झालेला सन्मान हा महिला शिक्षकांसह माझा देखील आहे. महिला शिक्षिका प्रपंच सांभाळून ज्ञानदानाचे काम करत आहेत. गुरुकुलने या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिसाहित्य संमेलन भरवले आहे. शिक्षकांना ज्ञानदानाबरोबरच इतर सरकारी कामे करावी लागतात. विद्यार्थ्यांना गणित शिकवायचे की इतर कामांचा हिशोब द्यायचा, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला असल्याचे राजळे यांनी सांगितले. गुरूकुलच्या महिला जिल्हाध्यक्षा वृषाली कडलग यांनी गुरुकुलची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री झरेकर व नीता सूर्यवंशी यांनी केले, तर सुप्रिया इंगळे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

घराघरांत व्हावे संविधानाचे पारायण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे सर्वांसाठी आहे. अनेकांकडे गाड्या आणि माड्या असतात. पण पुस्तके नसतात. देशात सध्या धर्मकारण सुरू आहे. विद्यापीठात ज्योतिषशास्त्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी संविधानाचे पारायण घराघरात होणे गरजेचे असल्याचे डॉ. सुधाकर शेलार यांनी सांगितले.

आता ‘प्री- वेडिंग’ आलंय

बदलता काळ आणि रुढी-परंपरेवर डॉ. संजय कळमकर यांनी शेलक्या भाषेत ताशेरे ओढले. लग्नात आंतरपाठ धरला जातो. पण आता ‘प्री- वेडिंग’ नवीच फॅड आलंय. लग्नाआधीच जोडपं महिनाभर फिरून येते. त्यामुळे आंतरपाठ कितीही ताणून धरला तरी काहीच फायदा नसल्याचे कळमकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com