Ahmednagar : आमदार पाचपुतेंना वर्षभरात तिसरा धक्का, गड आला पण ‘सिंह’ गेला.

पाचपुते गेले अन्‌ पाचपुतेच आले
आमदार बबनराव पाचपुते
आमदार बबनराव पाचपुते sakal

श्रीगोंदा : काष्टी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुलगा प्रतापसिंह पाचपुते यांच्या पराभवामुळे आमदार बबनराव पाचपुते यांना वर्षभरात तिसरा राजकीय धक्का बसला. बेलवंडीत अण्णासाहेब शेलार यांनी मुलगा ऋषिकेश याला सरपंच करीत त्याचे लाँचिंग केले.

काष्टीत आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन सदाशिव पाचपुते यांनी स्थानिक विरोधी गटाशी हातमिळवणी करत पाचपुतेंच्या विरोधात मंडळ उभारले होते. या निवडणुकीत आमदार पाचपुते गटाने सतरापैकी दहा जागा जिंकत बहुमत मिळविले, परंतु सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते यांनी प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांचा १९० मतांनी पराभव करीत आमदार पाचपुते गटाला मोठा धक्का दिला. शिवाय, त्यांनी सात जागाही खेचून आणल्या. साजन यांनी योग्य पद्धतीने निवडणूक हाताळली, शिवाय त्यांना विरोधकांची मोठी मदत झाली.

प्रतापसिंह यांचा पराभव पाचपुते गटाच्या जिव्हारी लागला आहे. नागवडे कारखाना निवडणुकीत प्रतिभा पाचपुते यांचा पराभव, काष्टी सेवा संस्थेच्या निवडणुकीत भगवानराव पाचपुतेंचा पराभव आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीतील मुलाच्या पराभवाने आमदारांना वर्षभरात सलग तिसरा धक्का बसला. पाचपुतेंचे राजकारण ‘बॅकफूट’वर चालल्याचा संदेश यानिमित्ताने गेला असून, पाचपुते कुटुंबातून साजन पाचपुते यांचे नवे नेतृत्व समोर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

बेलवंडीच्या मागील निवडणुकीत ज्‍येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार गटाला बहुमत मिळूनही सरपंचपद विरोधी गटाकडे गेले होते. यावेळी ज्‍येष्ठ नेते अण्णासाहेब शेलार यांनी ही निवडणूक एकतर्फी जिंकली.

मुलगा ऋषिकेश याला सरपंच करीत शेलार यांनी सरपंचपदाच्या पराभवाचा वचपा काढला. या निवडणुकीत विरोधी गटातील बेबनावाचा फायदा घेत मुलाचे लाँचिंग केले. घोगरगावमध्ये ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी सरपंचपद आणि तेरापैकी अकरा जागा जिंकत मोठा विजय मिळवून, मागील निवडणुकीतील पराभव धुऊन काढला. पारगाव सुद्रिक येथे पंधरापैकी अकरा जागा जिंकत पाचपुते-नागवडे गटाने बहुमत मिळवले. मात्र सरपंचपदी राष्ट्रवादीच्या सुरेखा दत्तात्रय हिरवे विजयी झाल्या.

माळशिखरे अवघ्या तीन मतांनी विजयी

थिटेसांगवीमध्ये अर्जुन शेळके यांनी सरपंचपदासह बहुमत मिळवीत सत्ता काबीज केली. चवरसांगावी येथे राष्ट्रवादीच्या सुनीता माळशिखरे अवघ्या ३ मतांनी विजयी झाल्या. तरडगव्हाणमध्ये राष्ट्रवादीच्या कुंदा राजेंद्र बेरड ३३१ मते मिळवून ७ मतांनी विजयी झाल्या. तांदळी दुमाला येथे राष्ट्रवादीचे संजय मारुती निगडे विजयी झाले. माठ येथे सर्वपक्षीयांनी एकत्र येत आघाडी केली होती. येथे अरुणा विश्वनाथ पवार या ७२२ मते मिळवून ३९५ मतांनी निवडून आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com