
पारनेर : कुणी चिमुरडी, तर कुणी जरा थोरली... दगड-गोट्यांत, काट्या-कुट्यांत खेळणाऱ्या मुलांमध्ये अचानक शाळेच्या बाई अवतरल्या... शाळेतून आल्या म्हटल्यावर मुले गोळा झाली... पोरांनो, शाळेत येणार का, असे त्यांनी अदबीने विचारले. त्यावर मुलांनी सूर लावला, ‘बाई, आम्हाला शाळेत यायचंय. येऊ द्या ना !’
सुपे येथे वाळवणे रस्ता, बसस्थानक व औद्योगिक वसाहत या परिसरात मोलमजुरी करून पालांत राहणाऱ्या लोकांच्या मुलांची ही स्थिती. शालाबाह्य विद्यार्थी शोधण्याचे आदेश शिक्षकांना आले. त्यानुसार त्यांनी शोधमोहीम सुरू केली. पालांत राहणाऱ्या मुलांची चौकशी केली असता, अनेक मुले शालाबाह्य आढळली. या वसाहतीत सुमारे शंभराहून अधिक शालाबाह्य मुले आहेत. त्यांनी कधी शाळाच पाहिलीच नाही. त्यांच्या जीवनातील शैक्षणिक अंधार कधी संपणार, शिक्षणाची पहाट कधी उगवणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून सहा ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण केले आहे. या योजनेंतर्गत एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन सरकारी पातळीवर शिक्षण विभागास केले आहे. तसा आदेशही शिक्षण विभाग वेळोवेळी काढत असते. या विभागामार्फत शालाबाह्य मुलांचा शोधही घेतला जातो. मात्र अनेकदा तो केवळ कागदोपत्री असतो. याची परिचित या ठिकाणची वसाहत पाहिल्यानंतर येते.
गेल्या अनेक वर्षांपासून शालाबाह्य मुले शोधण्याचे कामही शिक्षक करत असतानाही अशा प्रकारे एकाच गावात शंभराहून अधिक मुले शालाबाह्य असतील, तर राज्यात ती संख्या किती असेल, याचा विचार न केलेलाच बरा, असा प्रश्न उपस्थितांना पडला.
सुपे येथील पालांच्या वस्तीपासून हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. तसेच गावात व परिसरातही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. माध्यामिक विद्यालय सुद्धा आहे. अनेक खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुद्धा आहेत. असे असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील, तर शिक्षण विभाग काय करतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मुलांना सुपे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका प्रतिभा फलके, सुवर्णा पाडेकर व संजय बर्डे शाळेत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
या मुलांना शाळा शिकण्याची इच्छा असूनही अद्यापही या मुलांनी शाळा पाहिली नाही. या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरवर्षी शालाबाह्य मुले शोधण्याचा उपक्रम राबविला जातो, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पालात राहणाऱ्या मुलांकडे मात्र शिक्षण विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
संस्थेने घ्यावा पुढाकार
यापूर्वी या पालांतील मुलांना शाळेत आणण्याचा अनेक वेळा प्रयत्न झालेला आहे, मात्र या मुलांना शाळेची गोडी लागत नाही. त्यासाठी एक वेगळा उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. अन्यथा वर्षानुवर्षे दारिद्र्याच्या खाईत असलेली ही मुले व हा समाज यापुढेही दारिद्र्यातच राहणार आहे. या मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश पाडण्यासाठी तसेच त्यांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी एखाद्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.