अहमदनगर: राजकीय वर्तुळात सध्या तेलंगणच्या के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीची (बीआरएस) चर्चा आहे. त्यांनी नांदेड, औरंगाबादमार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. त्यांचा हाच प्रवास अहमदनगर जिल्ह्यात पोचला आहे. सर्व मतदारसंघांत त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांचाही वाढता प्रतिसाद प्रस्थापित राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढविण्याची शक्यता आहे.
भारत राष्ट्र समितीला अहमदनगर जिल्ह्यातून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल महाराष्ट्राचे समन्वयक दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी श्रीगोंद्याचे समन्वयक टिळक भोस, संदीप राजळे, विवेक मोरे, राजेश बाठिया आदी उपस्थित होते.
पक्षाच्या ध्येयधोरणाबद्दल माहिती देताना सावंत म्हणाले, की आतापर्यंत आम्ही शेतकरी संघटनेतून सामाजिक प्रवास केला, परंतु तेलंगणाच्या केसीआर यांनी महापुरुषांना अभिप्रेत असा कारभार केला आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणणारे हे एकमेव मुख्यमंत्री आहेत.
तेथे प्रत्येक गावात पिण्याचे शुद्ध पाणी आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत आहे. पेरणीसाठीही एकरी १० हजारांची मदत मिळते. शिक्षणासाठी विविध योजना आहेत. सीमाभागातील प्रतिसादामुळे, तसेच त्यांच्या अपेक्षांमुळे पक्षाने महाराष्ट्राकडे लक्ष वेधले.
शेतकऱ्यांना तेलंगणाची सफर
निवडणुकीपूर्वी तेलंगणात केसीआरने राबविलेल्या योजनांच्या प्रचाराबद्दल बीएसआरची आक्रमक योजना आहे. एक महिना त्यांचे हे अभियान राबविले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील शेतकऱ्यांना तेलंगणाची सफर घडवून आणली जाणार आहे. तेथे नेमके कशा पद्धतीने काम झाले, हे दाखविले जाणार आहे. त्यानंतर आगामी सर्व निवडणुकांत उमेदवार उभे केले जातील.
काय आहे रणनीती?
भारत राष्ट्र समितीने शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक मतदारसंघात समन्वयक नेमला आहे. प्रत्येक गावात ११ कमिट्या बनविल्या जात आहेत. पक्षात सक्रिय सभासद करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते दौरे करीत आहेत. त्यांच्यासाठी एक गाडी, भोंगा देऊन तेलंगणातील लोककल्याणकारी योजनांचा प्रचार केला जात आहे. नावनोंदणीसाठी टॅबही दिलाय. आतापर्यंत पंधरा हजार कार्यकर्त्यांची नोंदणी झालीय.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.