
अहमदनगर : बंडखोर आमदारांच्या मतदार संघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे हे सभा घेत आहेत. त्यांत त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यावरून राज्यातील मतदार हे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आहेत. आता निवडणूक झाल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा शिंदे-फडणवीस यांचा डाव आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
अहमदनगरमधील राष्ट्रवादी भवनात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक जयंत पाटील यांनी घेतली. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार नरेंद्र घुले, घनश्याम शेलार, कपिल पवार आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, राज्यातील बंडखोर आमदार व मंत्र्यांच्या मागण्या जास्त आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांत अस्वस्थता आहे. यातच बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन आदित्य ठाकरे सभा घेत आहेत. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरून जनता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. शिंदे गट व भाजप विरोधात जनतेत मोठा रोष आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. आपला प्रयत्न निवडणुका लवकर व्हाव्यात असाच आहे.
दसऱ्याला उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहेत. त्यानंतर जनतेचा रोष कळेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी व्हावी म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रवादीची ताकद वाढावी यासाठी पक्ष नोंदणी मोहीम महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीश्वरांपुढे मुख्यमंत्री गप्प
दिल्लीश्वरांपुढे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गप्प बसल्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले. गुजरातपेक्षाही जास्तीचे पॅकेज महाराष्ट्राचे होते. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यांना सांगून तळेगाव दाभाडे परिसरात हा प्रकल्प होणार होता. महाराष्ट्राला ७७ पैकी केवळ ३ गुण कमी होते. दिल्लीतील कोणाच्या तरी दबावाने प्रकल्प गेला. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने वाईट झाले, अशी टीकाही पाटील यांनी केली.
महिला जिल्हाध्यक्ष लवकर निवडा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहेत. या संदर्भात जयंत पाटलांनी सांगितले की, सर्वानुमते महिला जिल्हाध्यक्षाची लवकर निवड करा. जिल्हाभर फिरेल व बोलू शकेल अशी महिला निवडा, अशी सूचनाही त्यांनी केली. राष्ट्रवादी सभासद नोंदणीबाबतही त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.