
Ahmednagar : पुण्याचे काम करायला भाग्य लागते ; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे
संगमनेर : पुण्याचे काम करायला भाग्य लागते, ते तुमच्या नशिबी आले नाही यात आमचा काय दोषॽ पुण्याचे काम आमच्या हातूनच व्हायचे होते, असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख न करता लगावला.
निळवंडे धरणाच्या मुखापासून कालव्यांची पाहाणी करताना संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा ते गुंजाळवाडी पर्यंत सुरू असलेल्या कालव्याच्या कामाचा आढावा घेत त्यांनी या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले.
विखे पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा आता संपत आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता करून पाण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवार (ता. ३१) रोजी होत असल्याची बाब सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने निळवंडे प्रश्नावरून कोण काय म्हणतो याकडे लक्ष देत नाही. या प्रकल्पावरून झालेले रणकंदन अनेक वर्षे सर्वांनी अनुभवले याकडे लक्ष वेधत, राज्यात ज्या पक्षाचे सरकार होते त्यांनी या प्रकल्पासाठी निर्णय केले. त्यामुळे प्रकल्प मार्गी लागला आहे. आरोप होत राहतात.
कालपर्यंत वाळू अभावी कालव्यांची काम ठप्प असल्याचे वक्तव्य करणाऱ्यांना कालव्यातून पाणी सोडावे म्हणून मागणी करण्याची उपरती झाली. पण कालव्यांच्या कामाची सुरूवात धरणाच्या मुखापासून युती सरकारच्या काळात सुरू झाली आणि युती सरकारच आता पाणी देणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड, बापूसाहेब गुळवे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, भीमराज चत्तर, रविंद्र थोरात जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, प्रांताधिकारी हिंगे, जलसपंदा विभागाचे अरूण नाईक आदी उपस्थित होते.