
अहमदनगर : पांढरं सोनं भाव खाणार !
अहमदनगर : पांढरं सोनं म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे पीक यंदा भाव खाणार, असे कृषीतज्ज्ञांचा अंदाज आहे. रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इतर वस्तुंबरोबरच काॅटन मंदीत आहे. प्रमुख उत्पादक असलेल्या चीनमधील कापसाची गुणवत्ता कमी आहे. भारताची सर्वोत्कृष्ठ आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आॅस्ट्रेलिया, अमेरिकेतून निर्यातीच्या अडचणी आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताच्या कापसाकडे जागतिक पातळीवर लक्ष लागले आहे. त्यामुळेच यंदा कापसाला चांगले दर मिळण्याची शक्यता असून, कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
जगाचा चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत हे प्रमुख कपाशी उत्पादक देश आहेत. ऑस्ट्रेलियाची निर्यातक्षमता मर्यादित आहे. तसेच चीनच्या कपाशीची गुणवत्ता खालच्या पातळीवरची असते. चीनमधील कृषी व्यवस्थापन कोरोनामुळे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे कपाशी निर्यातीला भारताला मोठी सुवर्णसंधी आहे. मागील वर्षी कपाशीला चांगला भाव मिळाला. त्यामुळे या वर्षी कपाशीकडे अनेक शेतकरी वळताना दिसत आहेत. चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्राझीलमध्ये कापसाची खरेदी सातत्याने वाढत आहे. चीनमध्येही कापसाचा साठा कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे कापसाला मागणी वाढणार आहे, असे दिसते. तसेच भारतात हरियाणा, पंजाब आदी राज्यांत कपाशीला पडलेल्या रोगांमुळे सुमारे ७० टक्के नुकसान झाले. त्यामुळे तेथील क्षेत्र या वर्षी घटण्याची शक्यता आहे. साहजिकच महाराष्ट्रातील कापसाला या वर्षी चांगला भाव मिळेल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
चांगल्या उत्पादनासाठी हे महत्त्वाचे
विशेषतः १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावर कपाशीची लागवड करावी
जैविक, रासायनिक, सेंद्रिय खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करावा
एकात्मिक किड नियंत्रण फार महत्त्वाचे
कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी खत व पाणी व्यवस्थापन आवश्यक
कीड व रोगांचा बंदोबस्त आणि तणनिर्मूलनाकडे लक्ष द्यावे
लागवडीनंतर शेंडा खुडणे, अशा अंतरमशागती आवश्यक
बीटी कॉटनमध्ये जीनची संख्या अडीचशे पाहिजे
बोंडे सडणे, बोंड अळीचा प्रादुर्भाव याबाबत लक्ष हवे
फुल गळ व पातेगळ यासाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे
६० ते ९० दिवसापर्यंत चांगली काळजी हवी
तहानलेल्या अवस्थेत पाणीपुरवठा नियमितपणे केल्यास फुल गळ व पातेगळ कमी होते.
भारतात कपाशी क्षेत्र वाढीची कारणे
तुरीच्या पीकाला कमी दर मिळाल्याने कपाशीकडे शेतकरी वळले
कपाशीला गेल्या वर्षी चांगला भाव मिळाला
ऊसतोडीसाठी जादा दर, कारखान्यांकडून कमी दर यामुळे नफा नाही
जागतिक स्तरावर काॅटनची वाढती मागणी
जिल्ह्यातील कपाशीचे वाण
अहमदनगर जिल्ह्यात लागवड होत असलेल्या कपाशीच्या वाणांमध्ये शंकर ६, सुपर काॅट, सैराट, धनदेव, राशी ६५९, राशी ७३९० यांचा समावेश असतो. या जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात कपाशीचे उत्पन्न चांगले मिळते. विशेषतः शेवगाव, पाथर्डी या तालुक्यात हे क्षेत्र जास्त आहे.
एक जूनपासून बियाणे विक्री सुरू झाली आहे. कपाशीच्या बियाण्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे या वर्षी कपाशीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन केले आहे. बियाणे कमी पडणार नाही, याची काळजी घेत आहोत.
- शंकर किरवे, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद
सध्या कपाशीला चांगली मागणी आहे. मागील वर्षी १२ हजाराच्या दरम्यान क्विंटलला भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे वाढला आहे. सध्या बियाण्यांची कमतरता जाणवत आहे. या वर्षी कपाशीचे क्षेत्र मोठ्या स्वरुपात वाढेल, असा अंदाज आहे.
- ॲड. शिवाजी काकडे, अध्यक्ष, जनशक्ती टेक्सटाईल मील
जागतिक पातळीवर रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे काॅटनची मागणी वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात चांगले दर मिळतील. चीनमध्ये कापूस उत्पादन व विक्रीला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यात तेथील कपाशी दर्जेदार नसते. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताच्या कापसाला चांगली मागणी आहे. साहजिकच या वर्षीही कापसाला चांगला दर मिळेल, अशी शक्यता आहे.
- डाॅ. अशोक ढगे, कृषी शास्त्रज्ञ
Web Title: Ahmednagar White Gold Prices Cotton Go Up
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..