
प्रत्यारोपणाद्वारे पहिल्या गिर जातीच्या कालवडीचा जन्म
राहुरी विद्यापीठ - देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून गो संशोधन व विकास प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्रथमच गिर जातीच्या कालवडीचा जन्म झाला. कृषि महाविद्यालय, पुणे येथे या तंत्रज्ञानाच्या वापराने पहिल्याच गीर जातीच्या कालवडीचा जन्म संकरित गायीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकरांच्या गोठयात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुरुवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे. अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.
राहुरी येथील एनडीडीबी मार्फत राबविण्यात येत असून उच्च वंशावळीचा देशी गोवंश व त्यांची संख्या वाढवण्यासाठी, संवर्धनासाठी खूप मोठी मदत होणार आहे. सध्या देशातील शुद्ध देशी गोवंशाची असलेली घटती संख्या पाहता जलदगतीने उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या गाईंची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचे मत यावेळी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी व्यक्त केले व सर्व शास्त्रज्ञाचे अभिनंदन केले. संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर , डॉ. दिनकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे, विभाग प्रमुख, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे, डॉ. सुनिल अडांगळे तसेच एनडीडीबीचे डॉ. शिवकुमार पाटील हे काम करत आहेत.
काय आहे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान?
उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगला अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे व तयार झालेल्या फलित अंडाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गायीमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ करणे व त्यापासून उच्च दर्जाचे वासरू मिळवणे. भ्रूण प्रत्यारोपण प्रकल्प समन्वयक डॉ. विष्णू नरवडे : राहुरी येथे जन्मलेल्या कालवडीचे वजन २२.९ किलो असून पिता विष्णू या वळूमातेचे दूध ४१६५ ली. आहे व फॅट ५ % एवढे आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी ही भूषणावह बाब असून देशामध्ये देशी गाईंची घटती संख्या पाहता भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हा आशेचा किरण असून या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकर्यांपर्यंत होणे अत्यंत गरजेचे आहे. देशामध्ये एकूण गाईच्या संख्येपैकी ७५ % गाई ह्या गावठी स्वरूपात आढळत असून फक्त २५ % गाई शुद्ध स्वरूपात आहेत. त्यामुळे भविष्यात उच्च दर्जाच्या जलदगीतेने गाई तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज असेल.
- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू.