भारतातील औषधनिर्मिती कंपन्या सक्षम; डॉ. रमण गंगाखेडकर

डॉ. रमण गंगाखेडकर; कोरोनाचा धोका संपला नाही, उपाययोजना आवश्यक
डॉ. रमण गंगाखेडकर
डॉ. रमण गंगाखेडकर sakal

अहमदनगर : पॅरासिटॅमॉलची पावडर चीनकडून आयात करावी लागत होती. कोरोना काळात मोठा तुटवडा निर्माण झाल्याने चीनने ती काही अंशी थांबविली. मात्र, भारतीय कंपन्या सरसावल्या. स्वतः ही पावडर तयार करून गोळ्या तयार होऊ लागल्या. त्यामुळे मोठी मागणी असूनही हे औषध कमी पडले नाही. दुसऱ्यावर अवलंबून न राहता भारतात औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्या स्वतः सक्षम झाल्या, ही मोठी उपलब्धी आहे. कोरोना अद्याप संपला नाही. हॉंगकॉंगमध्ये मृत्यू वाढत आहेत. चीनमध्ये फैलाव वाढला आहे. त्यामुळे भारताने बेसावध राहून चालणार नाही. उपाययोजना चालूच ठेवाव्या लागतील, असे मत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या साथ व संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

डॉ. गंगाखेडकर यांनी आज येथील साईदीप रुग्णालयात भेट दिली. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस. एस. दीपक यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. गंगाखेडकर यांनी कोरोना काळात कोरोनावर मोठे संशोधन केले आहे. लसीकरणाच्या मात्रेबाबत नियोजनात त्यांचा मोठा सहभाग होता. आजही ते कोरोनाच्या उत्पत्तीबाबत जागतिक पातळीवर संशोधन करीत आहेत. कोरोनाबाबतीत सरकारच्या अनेक धोरणांत त्यांचा मोलाचा सहभाग होता. राष्ट्रीय एड्‌स संशोधन संस्थेचे ते संचालक होते. त्यांनी यापूर्वी एचआयव्हीबाबत संशोधन केले आहे. विशेष संशोधनाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोविड काळात त्यांनी देशाला कायम अद्ययावत माहिती देत लोकांच्या शंकांचे समाधान केले.

कोरोनाविषयक विविध प्रश्नांबाबत बोलताना ते म्हणाले, की कोरोना काळात भारतीय संशोधकांनी ५८ औषधे नव्याने शोधली. आयात होणारी औषधे देशातच तयार होऊ लागली. त्यामुळे आपला देश वैद्यकीय क्षेत्रात अधिक सक्षम झाला आहे. कोरोनाचा संसर्ग भारतापेक्षा इंग्लंड, अमेरिकेत कमी होता. भारतीयांची प्रतिकारशक्ती जास्त असली, तरी आजारही मोठ्या प्रामाणात फैलावत आहे. जगात कोरोना संपत नाही तोपर्यंत तो केव्हाही डोके वर काढू शकतो. हॉंगकॉंगमध्ये

सध्याही कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. तेथील व्यवस्था कोलमडली आहे. चीनमध्येही हा संसर्ग आटोक्यात येण्यास अद्याप वेळ लागणार आहे. भारतात तो आटोक्यात असला, तरी दोन महिन्यांनंतर रुग्ण वाढण्याची भीती आहे. कोरोनाचे अल्फा, बीटा, डेल्टा आणि सध्या सुरू असलेले ओमिक्रॉन हे संसर्ग दिसून आले. त्यात ओमिक्रॉन खूप त्रासदायक नव्हता; परंतु पुढील एखादा नवीन संसर्ग येऊ शकतो. त्यामुळे भारतीयांना जपून राहावे लागेल. कोरोनाविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी काही महिने तरी करावी लागेल.

लसीकरण अवश्य करा

कोणत्याही लसी मानवी शरीरात घेणे गरजेनुसार फायदेशीर ठरते. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या रुग्णांमध्ये कोरोना आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे लस घेणे आवश्यक आहे. नवीन विषाणू अचानक येतो. त्याला प्रतिकार करण्यासाठी आपण सक्षम असले पाहिजे. साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या, तसेच रक्तदाब असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेतली पाहिजे, असे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com