गावात करोना तर शेतात बिबट्याची दहशत 

wild leopard
wild leopard

नेवासे : सर्वत्र कोरोनाचे सावट असतांनाच नेवासे तालुक्‍यातील शेतकरी सध्या शेत शिवारात बिबट्यांच्या मुक्तसंचारामुळे दहशतीखाली सापडला आहे. सध्या लॉकडाउन शिथिल झाल्याने शेतकरी खरीपाच्या तयारीला लागला खरा, मात्र शेतात बिबट्याच्या होणाऱ्या दर्शनामुळे शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी आता कोरोना व बिबट्या असा दुहेरी संकटात सापडला आहे. 

बिबट्यांचा वाढत्या मुक्तसंचारामुळे वन विभागाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याभागातील शेतकरी भ्रमणध्वनी फक्त बिबट्या आला रे.. बिबट्या गेला रे.. याच साठी जास्तीजास्त वेळा खणखणत असल्याचे शेतकरी सांगतात. नेवासे तालुक्‍यातील उसाचे आगार समाजाले जाणारे तेलकूडगाव, देडगाव, जेउर हैबती, देवगाव, भेंडे, चांदे या दक्षिणभागासह उस्थळ खालसा, भालगाव, घोगरगाव या गोदावरी पटयात पाणी व उसाचे मोठे क्षेत्र असल्याने या भागात रानडुकरे मोठ्याप्रमाणात असल्याने याभागात बिबट्यांचा नेहमीच मुक्तसंचार असतो. लॉकडाउन काळात या बिबट्यांच्या गाव शिवारातही मुक्तसंचार वाढला आहे. यंदा पावसाबरोबरच गेल्या चार-पाच वर्षात प्रथमच शेतीला मुबलक पाटपाणी मिळाल्याने शेतकरी खुश आहे. मात्र पानी असूनही शेतीला रात्रीचा वीजपुरवठा असल्याने बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत असल्याची वस्तुस्थिती आहे.

तेलकुडगाव येथेतर बिबट्याचे दर्शन नित्याचेच आहे. रानडूकरांपासून आपल्या शेतातील पिकांचे राखण करण्यासाठी शेतात जाणाऱ्या तसेच रात्री दारे धरण्यासाठी गेलेल्या अनेकांना असेच नांगरण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्‍टर चालकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांनी रात्रीच्या शेतीकामांना रामराम ठोकला आहे. 

तालुक्‍यात वनविभागाचे नेवासे व घोडेगाव असे दोन विभाग आहेत. या दोन्ही विभागात सुमारे दहा-पंधरा नर-मादी बिबटे असल्याची वनविभागाकडून समजते. त्यासाठी तालुक्‍यात पाच ठिकाणी पिंजरेही लावण्यात आले. असे असलेतरी बिबट्या नेहमीच पिंजऱ्यांना हुलकावणी देत आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीची पावले उचलावी अशीच अपेक्षा अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. 

दिवसाचाच वीज पुरवठा द्या; शेतकऱ्यांची मागणी 
शेतीसाठी देण्यात येणारा वीजपुरवठा हा महावितरणच्या नियोजनात विविध भागासाठी आठ दिवस दिवस-रात्र असा दिला जातो. मात्र वरील गावातील बहुतांशी शेतकरी बिबट्यांच्या दहशतीमुळे धोका नको म्हणून रात्री शेतात पिकांना पाणी धरण्यासाठी जाण्याचे टाळतात. 

"शेतकऱ्यांत मुक्तसंचार करणाऱ्या बिबट्यांची मोठी दहशत आहे. त्यामुळे दिवसाही शेतात जाण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे शेतीचे अनेक कामे रखडली आहे. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी या भागात पिंजरे लावून बंदोबस्त करावा. 
- प्रतीक घाडगे, युवा शेतकरी, तेलकुडगाव, ता. नेवासे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com