लग्नघरी, मांडवात ही लहान मुलं फिरली तर "कार्यक्रम" झालाच म्हणून समजा

Children steal gold ornaments from the wedding hall
Children steal gold ornaments from the wedding hall

नगर : विवाहसोहळा दोन जीवांसह कुटुंबांना एकत्र आणणारा सोहळा. चिमुकल्यांसाठी तर आनंदाचा, उत्साहाचा क्षण. मात्र, अशाच निरागस बालकांचा वापर करीत काही जण सोहळ्यात हातसफाई करीत. मध्य प्रदेशातील चोरांच्या टोळीच्या मुसक्‍या आवळल्यावर त्यांच्या चोरीचा फंडा पाहून काही वेळ पोलिसही चक्रावून गेले. 

गेल्या काही दिवसांपासून लग्नसोहळ्यांत चोरीचे प्रकार वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी या चोरांचा छडा लावण्याचा चंगच बांधला. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले नि मध्य प्रदेशातील एक टोळी जेरबंद झाली. त्यांच्या चोरीची पद्धत पाहून पोलिसही अवाक्‌ झाले. विशेष म्हणजे, यापूर्वीही पोलिसांनी तीन वेळा मध्य प्रदेशातील टोळ्यांना अशाच गुन्ह्यात अटक केली होती. 

महागड्या वाहनांचा वापर 
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया, सिबलिया, गुलेडीसह पाच गावांत गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. दिवाळीनंतर त्या महाराष्ट्रासह देशभर फिरतात. महागड्या आलिशान वाहनांतून प्रवास करतात. खानपान, कपडे व मुक्काम असे सगळे काही वाहनात. नगरसह शिर्डी व संगमनेर परिसरातील मंगल कार्यालयांची टेहळणी ही टोळी करीत असे. कुठे लग्न आहे, वऱ्हाडी कुठे थांबले आहेत, मुला-मुलीकडील नातेवाईक कोण कोण आहेत, याची चाचपणी करीत. 

निरागस मुलाचा वापर 
मंगल कार्यालयातून चोरीसाठी ही टोळी निरागस मुलाचा वापर करीत होती. साधारणपणे आठ-दहा वर्षांचा हा चिमुकला लग्नात सतत नवरीच्या मागे-पुढे फिरत असे. अंगावर नवीन कपडे, पायात नवे बूट, यामुळे त्याचा कोणाला संशयही येत नसे. चोरीचे प्रशिक्षण दिलेले असल्याने तो पैसे, दागिने न्याहाळत असे. संधी साधून काही क्षणात दागिने-पैशांची पिशवी लांबवीत असे. टोळीतील सदस्य बाहेर वाहनात थांबलेले असत. हातात पिशवी पडताच टोळी तेथून पसार होत असे. मध्य प्रदेशाच्या सरहद्दीवर दुसऱ्या टोळीकडे पिशवी सुपूर्द केली जात असे. गावाकडे गेल्यावर पैशांची वाटणी होत होती. चोरीनंतर पुन्हा 15 दिवस ही टोळी त्या भागात फिरत नसे. त्यामुळे पोलिसही चक्रावून जात. 

पोलिसाचे पिस्तूल लांबविले 
न्यू टिळक रस्त्यावरील एका मंगल कार्यालयातून चार वर्षांपूर्वी लहान मुलाने पैशांची बॅग लांबविली. त्यात एका पोलिस निरीक्षकांचे पिस्तूल होते. भाचीच्या लग्नासाठी ते नगरला आले होते. त्यांनी बॅगेत पिस्तूल ठेवले होते. कोतवाली पोलिसांनी मध्य प्रदेशातून पिस्तूल हस्तगत केले होते. 

विवाह सोहळ्यात लोकांनी रोकड, दागिन्यांची काळजी घेतली पाहिजे. दागिने बॅगेत ठेवा; पण बॅग सतत स्वत:जवळ ठेवा. सोहळ्यात कोणी संशयित दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. 
- अनिल कटके, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com