The number of students in Zilla Parishad schools will increase
The number of students in Zilla Parishad schools will increase

"कोरोना'चा ग्रामीण मराठी शाळांना हा होणार फायदा, मास्तरांची थांबणार वणवण

नगर  : कोरोनामुळे अनेक जण शहरातून गावी आले आहेत. त्यातील काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काही जण शहरापेक्षा गावच बरे, असे म्हणत आहेत. गावातच राहून मिळेल ते काम करून मुलांना येथेच शिकवू, असा निश्‍चय करून मुलांना गावातील शाळांमध्ये प्रवेश घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा पट वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. 

नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेकांनी शहराची वाट धरली होती. तेथेच सर्व जण आपल्या कुटुंबासह आपला उदरनिर्वाह करीत होते. कोरोनाचा कहर शहरांमध्येच सुरू असल्याने त्यापासून बचावासाठी अनेक जण गावाकडे येत आहेत.

गावातच राहून रोजगार मिळवून कुटुंबाचा चरितार्थ चालवू किंवा मुलांना शिक्षणासाठी गावी आजी-आजोबांकडे ठेवू आणि स्वतः शहरात राहून नोकरी करू, असा निर्धारही अनेकांनी केला आहे. परिणामी ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांचा पट वाढणार आहे. त्यामुळे दर वर्षी माध्यमिक शिक्षकांकडून शाळांचा पट वाढविण्यासाठी होणारी शोधमोहीम यंदा थांबवण्यात आली आहे.

गावात दाखल झालेल्यांच्या मुलांच्या संख्येमुळे अनेक शाळांच्या तुकड्या वाचणार असून, ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्‍यताही कमी झाली आहे. 

जिल्ह्यात पाच हजार 372 शाळा असून, पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या नऊ लाख चार हजार 404 आहे. त्यात चार लाख 94 हजार 651 मुले व चार लाख नऊ हजार 753 मुली आहेत. शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांची भर पडणार असल्यामुळे जिल्ह्यात विद्यार्थ्यांची संख्या दहा लाख होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

तालुकानिहाय विद्यार्थ्यांची संख्या 
अकोले ः 54176, जामखेड ः 31749, कर्जत ः 43579, कोपरगाव ः 67757, महापालिका क्षेत्र ः 81458, नगर ः 63003, नेवासे ः 73450, पारनेर ः 49428, पाथर्डी ः 55226, राहाता ः 68211, राहुरी ः 60129, संगमनेर ः 93812, शेवगाव ः 52151, श्रीगोंदे ः 53786, श्रीरामपूर ः 56489 

प्रवेश देण्यासंदर्भात मुख्याध्यापक नेहमीच सकारात्मक : पंडित
शाळांमध्ये मागतील त्यांना प्रवेश देण्यासंदर्भात मुख्याध्यापक नेहमीच सकारात्मक राहिले आहेत. पालकांनी मुलांना प्रवेशासंदर्भात प्रस्ताव देताच तो मान्य करून त्यांच्या पाल्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. 
- सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ 

पट कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार : शेळके
कोरोनामुळे अनेक जण शहरातील रोजगार सोडून गावात आले आहेत. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळांना आपल्या दर्जात सुधारणा करून वाढलेला पट कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 
- प्रताप शेळके, उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com