अहमदनगर : मागील तीन वर्षांपासून बंद असलेले बाजार समितीचे प्रवेशद्वार गुरुवारी उघडण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेत यावरून श्रेयवाद रंगला.
आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता बंद प्रवेशद्वार खुले केले.
यावेळी जगताप म्हणाले, मागील तीन वर्षांपासून बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्यासाठी बाजार समिती, व्यापारी असोसिएशनने जिल्हाधिकारी, रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सदाशिव लोखंडे यांना निवेदन दिले होते. त्यानुसार प्रवेशद्वार उघडण्यात आले. मात्र, काही लोक स्वतःची पोळी भाजण्याकरिता बाजार समितीचा वापर करीत आहेत.' सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, हरिभाऊ कर्डिले, बहिरू कोतकर, राजेंद्र बोथरा, उद्धव कांबळे, अविनाश घुले, सचिव अभय भिसे या वेळी उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने दुपारी पुन्हा हे प्रवेशद्वार उघडण्यात आले. यावेळी आमच्याच पाठपुराव्यामुळे हे प्रवेशद्वार उघडल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी वाहतूक नियंत्रण समितीमध्ये आवाज उठवून आमच्या मागणीला प्रतिसाद दिल्याने प्रवेशद्वार उघडण्यात आल्याचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, नगरसेवक योगीराज गाडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगत उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.