Ground water level in Amarpur area has increased due to river flow since June
Ground water level in Amarpur area has increased due to river flow since June

जूनपासून नदी वाहिल्याने अमरापूर भागात भूजलपातळीत वाढ

अमरापूर (अहमदनगर) : जूनपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरातील प्रमुख नद्या खळखळून वाहत असल्याने भुजलपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी वर्षभराच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून रब्बीच्या पिकांसाठी व शेतशिवारे हिरवीगार होण्यास मदत होणार आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जुनमध्ये वेळेवर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खरीप पिकांचा हंगाम सुरळीत सुरु झाला. त्यानंतर लागून राहिलेल्या संततधार पावसाने परिसरातील ओढे नाले व नदया खळखळून वाहू लागल्या.

अनेक वर्षापासून दुष्काळाशी सामना करणा-या वरुर, खरडगाव, आखेगाव, अमरापूर, आव्हाणे, वाघोली, ढोरजळगाव, आखतवाडे, वडुले, सामनगाव, भातकुडगाव या दुष्काळी भागाला या वाहत्या पाण्यामुळे नवसंजीवनी मिळाली. सततच्या पावसामुळे जमिनींना पाझर फुटला असून त्याचे पाणी ओढया नाल्यांमधून वाहते आहे. दोन महिन्यापासून वाहत असलेल्या परिसरातील नंदीनी नदीमुळे आखेगाव, खरडगाव, वरुर, भगुर, वडुले बुद्रुक तर सकुळा नदीमुळे अमरापूर, फलकेवाडी तर अवनी नदीमुळे ब-हामपूर, आव्हाणे खुर्द व बुद्रुक तर ढोरानदीमुळे वडुले, वाघोली, ढोरजळगाव शे व ने, आपेगाव, आखतवाडे, मळेगाव, सामनगाव, लोळेगाव या गावांचा परिसर जलयुक्त झाला आहे. नदीकाठच्या गावामधील भुजल पातळीत कमालीची वाढ झाली असून शेतशिवारातील विहीरी, कुपनलिका, भरुन वाहू लागल्या आहेत. 

त्यामुळे खरीप पिकांबरोबरच आगामी वर्षभरातील रब्बी व इतर पिकांची पाण्याची अडचण दुर झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बाजरी, कपाशी, तुर या पिकांबरोबरच ऊस, गहू, हरभरा, कांदा या ही बागायती पिके घेण्यावर परिसरातील शेतक-यांचा कल वाढला आहे. ऊसाचे व फळबागाचे क्षेत्र वाढल्याने शेतक-यांच्या उत्पन्नातही हळूहळू वाढ होत आहे. दिवसेंदिवस शेती अधिक खर्चीक होत असतांना त्यासाठी पाण्याचा हक्काचा स्त्रोत उलब्ध झाल्याने शेतक-यांची चिंता मिटली आहे. 

परिसरातील ढोरा नदीसह सर्वच प्रमुख नदयांवरील प्रत्येक गावात बंधारे बांधण्यात आले असून त्यावर पुढील महिन्यात फळया टाकुन पाणी अडवण्यात येणार आहेत. त्यानंतर किमान सहा महिने त्यात पाणी साठून राहणार असल्याने अनेक अंतरापर्यंत त्याचा फायदा शेतीला होणार आहे. भूजल पातळीत सध्या मोठया प्रमाणात वाढ झाली असून बंधारे अडवल्यानंतर शेती बारमाही पाण्याखाली येणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com