अकोले (अहमदनगर) : मराठा समाज व ओबीसी समाज यांच्यात वाद लावण्याचे काम करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करा, या मागणीसाठी दिल्लीतील काँग्रेस भवनावर शेतकरी मराठा महासंघाचे वतीने संभाजीराव दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राज गवांदे व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार सर्व समाज बांधव गुण्यागोविंदाने राहत आहे. मराठा समाजाने वडीलकीच्या नात्याने या समाजाला कधीही दुजाभावाची वागणूक दिली नाही. राज्यात दलित, अदिवासी, ओबीसी समाजाच्यामध्ये कधीही वादविवाद नाही. राज्यातील यशवंतराव चव्हाण यांचेनंतर वसंतराव नाईक, अ. र. अंतुले, सुशीलकुमार शिंदे यासारखे मुख्यमंत्री झाले. परंतु राज्यात कधीही दुफळी माजवली नाही. मात्र या मंत्रिमंडळात काही मंत्री विनाकारण समाजात वाद लावणारे वक्तव्य करीत आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलने होत आहे. हे आरक्षण कोणत्याही मराठा नेत्यांनी अथवा समाजातील घटकांनी ओबीसीमध्ये द्या, अशी मागणी केलेली नाही. आम्ही कोणाच्याही अधिकारावर गदा आणीत नाही. कोणाच्याही हिश्यात वाटेकरी होत नाही. कोणाचे कमी करून आम्हाला द्या असाही मराठा समाज मागत नाही. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या अशीही मागणी केलेली नाही. आम्ही आमच्या हक्काचं मागतो. मग ओबीसी नेत्यांच्या पोटात का पोटसुळ उठला असून बेताल वक्तव्य करून दोन समाजात दुही माजवून देत आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते राज्यातील इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार हे जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करत असतात. ओबीसी समाजाला मराठा समाजा विषयी राग निर्माण होईल, असे बेताल बोल काढीत असतात. पंडित नेहरू, इंदिरा गांधींच्या विचारांची काँग्रेस रसातळाला नेण्याच्या मार्गावर हे मंत्री आहेत.
विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी न केल्यास २१ नोव्हेंबरला नवी दिल्लीतील काँग्रेस भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा मराठा महासंघाचे अकोले तालुका उपाध्यक्ष अशोक आवारी, भाऊसाहेब हाडवळे, सचिव शिवाजी पाटोळे, संयुक्त चिटणीस बाळासाहेब कोकाटे, खजिनदार सुशांत वाकचौरे, युवक प्रतिनिधी अक्षय आभाळे, विद्यार्थी प्रतिनिधी अमोल मोरे, महिला प्रतिनिधी वर्षा चौधरी, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कदम, अमोल येवले, अविनाश तळेकर, संदीप शेळके यांनी दिला आहे.
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.