कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा विश्वास असल्यानेच सोपवल्या विविध जबाबदाऱ्या

Interview with Balasaheb Thorat on behalf of Rajasthan Youth and Malpani Udyog Samuha
Interview with Balasaheb Thorat on behalf of Rajasthan Youth and Malpani Udyog Samuha

संगमनेर (अहमदनगर) : घरातून रुजलेल्या कॉंग्रेसच्या विचारधारेशी निष्ठा राखल्याने, आमदारकीपासून प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास घडला. या पदांचा वापर करुन निळवंडे धरणाचे काम पूर्ण करता आले, याचे मनस्वी समाधान आहे. निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील लाभार्थीपर्यंत पोचेल, तो जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. 

राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहातर्फे संगमनेर फेस्टिव्हलच्या डिजिटल मंचावर घेतलेल्या मुलाखतीत मंत्री थोरात बोलत होते. रचना मालपाणी व डॉ. संतोष खेडलेकर यांनी थोरात यांच्या वाटचालीचा वेध घेत, जीवनातील विविध पैलू उजेडात आणले. 

मंत्री थोरात म्हणाले, "महात्मा गांधी यांचे विचार व कॉंग्रेसची विचारधारा घरात असल्याने, लोकांच्या आग्रहास्तव 1985मध्ये विधानसभा निवडणुकीतून राजकारणात प्रवेश झाला. तेव्हापासून सुरू झालेला विजयी प्रवास, सलग आठ वेळा मतदारसंघाचा प्रतिनिधी होईपर्यंत कायम आहे. या काळात पक्षाने राज्याची जबाबदारी सोपविल्याने चांगले काम करण्याची संधी मिळाली. विविध विकास योजना तालुक्‍यातील प्रत्येक वाडी-वस्ती व सामान्यांपर्यंत पोचवून त्यांना लाभ देता आला. संगमनेर शहराचा कायापालट करण्यासाठी बाह्यवळण रस्ता, प्रशासकीय भवन, पंचायत समिती, तहसील कार्यालय, हायटेक बसस्थानक, न्यायालय संकुल, अशा वास्तुंसह प्रवरा नदीवरील जुन्या पुलाला समांतर मोठा पूल, या कामांसाठी विविध योजनांतून मोठा निधी आणला.'' 

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांचा विश्वास असल्याने, गुजरातची निवडणूक, हिमाचल प्रदेशचे निरीक्षक, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व पक्ष अडचणीत असताना राज्याचे प्रदेशाध्यक्षपद, अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडता आल्याचे समाधान थोरात यांनी व्यक्त केले. अनेक दशकांपासून केवळ चर्चेत असणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामाला गती देऊन ते पूर्णत्त्वास नेण्याचे काम जीवनातील सर्वात मोठा प्रसंग आहे. पुढील दोन वर्षांत कालव्यांची कामे तडीस नेऊन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोचविण्याचे लक्ष्य आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे थोरात म्हणाले. 

संगमनेर तालुक्‍याचे सुसंस्कृत राजकारण व्यक्तीद्वेषावर चालत नाही. असेच वातावरण कायम ठेवून संगमनेर तालुका विकासकामांच्या बाबतीत राज्यात अग्रभागी राहण्यासाठी काम करीत राहणार असल्याची ग्वाही थोरात यांनी दिली. संगमनेर फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रास्ताविकात आढावा घेतला. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com