कोल्हार (अहमदनगर) : अतिवृष्टीमुळे शेतात साचलेले पावसाचे पाणी बाहेर निघत नसल्याने पिके अक्षरशः सडली. पिकांवर आतापर्यंत झालेला खर्चही पाण्यात गेला. याबाबत शासन- प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणी दखल न घेतल्याने जेरीस आलेल्या एका शेतकऱ्याने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने कोल्हार- तिसगाववाडी रस्ता खोदत पाण्याला वाट मोकळी करून दिली.
या वर्षी सुरवातीपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हारमधील नगर- मनमाड रस्त्यालगतच्या निबे, तरकसे वस्तीवरील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिसरातील घरे, जनावरांचे गोठे, शेती जलमय झाली. यातच कमलाकर निबे, किशोर निबे या शेतकऱ्यांना यंदाही अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्याचा मोठा आर्थिक फटका बसला. त्यांनी याबाबत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे कोल्हार येथील नुकसानीच्या पहाणी दौऱ्याच्या गाऱ्हाणे मांडले होते. काही शेतकऱ्यांनी रस्ता खोदला. परंतु पूर्वेकडे पाणी काढू देण्यास काही जण आडवे आल्याने रस्ता खोदूनही काहीच उपयोग झाला नाही. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हा रस्ता खोदल्यामुळे तिसगाववाडी, ओम गुरुदेवनगर, कैवल्यधाम, मनाबाबा खर्डे वस्ती, वसंत भगवंत खर्डे, रांधवणे वस्ती भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना गावात येण्यासाठी आता तब्बल चार- पाच किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. दरम्यान, आमदार विखे पाटील यांच्या कार्यालयीन अधिकाऱ्यांनी आज संबंधित शेतकऱ्यांची भेट घेत उपाययोजनांबाबत चर्चा केली.
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.