महारेल दोन प्रमुख महानगरांना जोडणार! 'या' तीन जिल्ह्यातून जाणार

maharail
maharailesakal

संगमनेर (जि.अहमदनगर) : राज्यातील पुणे, नाशिक हा सर्वात श्रीमंत औद्योगिक, शैक्षणिक व कृषि पट्टा आहे. या दोन प्रमुख महानगरांना रेल्वे मार्गाने जोडण्याचे काम महारेल करेल. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमीटेड, महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने होणारा प्रस्तावित पुणे- नाशिक रेल्वेमार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातून जातो. यामुळे चाकण, राजगुरुनगर (खेड), मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर व सिन्नर येथील महत्वाचे उद्योग, विशेष आर्थिक क्षेत्र आणि कृषी केंद्र जोडली जाणार आहेत. प्रकल्प प्रभावीत क्षेत्रात दोन्ही बाजूला अंदाजे ५० किलोमीटर अंतरातील दूध, भाजीपाला, फळे, ऊस ही कृषी उत्पादने तर मंचर, जुन्नर, संगमनेर व सिन्नर येथील साखर कारखाने, सहकारी दूध संघ, दूध व खाद्यप्रक्रिया उद्योग आदींना या रेल्वेमार्गाचा लाभ मिळेल. (MAHARAIL-will-connect-two-major-metro-city-marathi-news-jpd93)

रेल्वेमार्ग पुणे, नगर, नाशिक या तीन जिल्ह्यातून जाणार

संगमनेर तालुक्यातील साखर, कांदा, टोमॅटो, बटाटा, अन्नधान्य, डाळींब तसेच दूध व दूग्धजन्य पदार्थ, भाजीपाला यांच्या देशभरातील वाहतूक व वेगवान निर्यातीसाठी या मार्गाचा उपयोग होईल. पुणे ते नाशिक दरम्यान २० स्थानके असून, बोटा, जांबूत, अंभोरे, साकूर, निमोण व संगमनेर टर्मिनलचा समावेश आहे. रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी रुळाखाली ७५० मीटर अंतरावर व्यवस्था होत आहे. तसेच प्रकल्पामुळे १२०० दिवसांच्या बांधकाम टप्प्यात २५ हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होत आहे. नाशवंत उत्पादनासाठी पार्सल व्हॅन सुविधेमुळे ताजा भाजीपाला, फळे, फुले देशातील मुख्य बाजारपेठेत पाठवता येतील. पुण्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट संपर्क असल्याने कार्गो टर्मिनलद्वारे इतर देशात निर्यातक्षम उत्पादने पाठवता येतील. वेळ व पैशांची बचत होताना माल साठवणूकीवरील खर्च कमी होणार आहे. चाकण, मंचर, आळेफाटा, नारायणगाव व संगमनेर या प्रमुख स्थानकावर खासगी मालवाहतूक टर्मिनल व विविध स्थानकांवर लोडींग अनलोडींग सुविधा मिळेल. गोदाम व शीतगृहाची व्यवस्था आहे. प्रकल्पबाधीत क्षेत्रात जमिनीच्या दरात वाढ आहे. अधीग्रहित जमिनीला योग्य नुकसान भरपाई तसेच उर्वरित जमिनीच्या किमतीत अनेक पटीने वाढ होणार आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षीत युवकांना रोजगारासाठी पुणे, नाशिक शहरात वास्तव्याची आवश्यकता पडणार नाही.

२३५ किलोमिटर अंतरात विद्युतीकरणासह डबल लाईनची ग्रीनफिल्ड सेमी हायस्पीड रेल्वे लाईनची रचना करणारे हे पहिले महारेल महामंडळ आहे. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार असून भविष्यात हा वेग २५० किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढवता येणार आहे. - सचिन कुलकर्णी, अपर महाव्यवस्थापक, महारेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com