
उद्योजक विलास उंबरकर यांना 'महाराष्ट्राची गिरीशिखरे' पुरस्कार
संगमनेर (जि. अहमदनगर) : अंगात कर्तृत्व, झेप घेण्याची उर्मी आणि जिद्द असेल तर अशक्यही शक्य करता येते याचा प्रत्यय आणून देणारे दुग्ध व्यावसायिक विलास उंबरकर यांना नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते महाराष्ट्राची गिरीशिखरे (Maharashtrachi Girishikhare) या राज्यस्तरिय पुरस्कारने गौरविण्यात आले.
शुन्यापासून सुरूवात आता कोटींची उलाढाल
तालुक्यातील उंबरी बाळापूर या छोट्याशा गावातील विलास उंबरकर यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले. या शेतकरी कौटूंबाची परिस्थिती यथातथाच असल्याने, मजूरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. उंबरकर यांनी ट्रकवर क्लिनर ते ड्रायव्हर असा पल्ला गाठला. चालक म्हणून नोकरी करताना त्यांच्या हातून अपघात झाल्याने त्यांनी तो धंदा सोडून १९९६ साली दोन गायी घेवून दुधाचा व्यवसाय सुरु केला. त्यात बारकाईने अभ्यास करुन सुधारणा केली. १९९८ साली स्वतःचे दुध संकलन केंद्र सुरु करुन दुग्धोत्पादकांचा विश्वास मिळवला. या व्यवसायातील खाचाखोचा समजल्याने मित्रांच्या मदतीने निमगावजाळी येथील दूध प्रक्रिया केंद्र खरेदी करुन, रंजन दूध प्रक्रिया केंद्राची मुहूर्तमेढ रोवली. या केंद्राची त्यांनी जिद्दीने भरभराट केली व पिशवीबंद दूध व इतर दुग्धजन्य पदार्थांचा रंजन दुध हा स्वतःचा ब्रँड त्यांनी विकसीत करुन त्याला मान्यता मिळवली आहे. याच दरम्यान त्यांना कर्करोगाने ग्रासले मात्र त्यांच्या पत्नी कुंदा यांनी त्यांचा हा सर्व अफाट पसारा सावरीत त्यांना हातभार लावला. या व्याधीवरही मात करुन उंबरकर यांनी पुन्हा नव्या जोमाने उद्योगाला सुरवात केली. एक लाख लिटर दूध आणी सुमारे १० कोटींची उलाढाल असा टप्पा त्यांनी गाठला आहे.
हेही वाचा: महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दहा नवीन वाणांना मान्यता
या दरम्यान त्यांना आलेला कणखर स्त्रीशक्तीचा प्रत्यय व कुंदा यांना मिळालेला आत्मविश्वास यातून त्यांनी महिला बचत गटाचा मोठा कारभार उभा केला. त्या माध्यमातून महिलांचे संगणकीकृत दूध संकलन केंद्र, दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी पतसंस्था, व राधीका अॅग्रो ही महिला शेतकरी उत्पादक कंपनीची सुरवात केली. त्यातून पशुखाद्य निर्मीती व किराणा मॉलही उभा राहीला आहे. आता सेंद्रीय शेतकरी गट तयार केले असून, दोनशे गायांचा मुक्त गोठा हा प्रकल्पही उभारला आहे. अवघ्या दोन गायांवर सुरु झालेल्या दुग्ध व्यावसायातून जिद्द, कठोर परिश्रम, सचोटी व पत्नीची खंबीर साथ या जोरावर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाचे मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत, मुंबईच्या पिपल्स आर्टस् सेंटर या मुंबईच्या संस्थेने महाराष्ट्राची गिरीशिखरे या पुरस्काराने सन्मान केला आहे.
हेही वाचा: अहमदनगर : श्रीरामपूर नगरपालिकेत आता प्रशासकराज
Web Title: Maharashtras Girishikhare Award To Entrepreneur Vilas Umbarkar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..