सिद्धटेक (अहमदनगर) : 'कोरोना'ला रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महसूल प्रशासनाने ग्रामस्तरावर "कोरोना दक्षता समिती' स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, अनेक ग्रामपंचायतींमध्ये या समित्या कागदावरच राहिलेल्या आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीने अनेक गावांमध्ये भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज नवनवीन गावे कोरोना प्रादुर्भावाच्या यादीत येताना दिसत आहेत. कर्जत तालुक्यात मागील महिन्यात असलेल्या 342 पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 864 वर गेला आहे. सध्या पन्नास टक्के गावांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. असे असताना गावपातळीवरील समितीसह आरोग्य विभागालाही याचे गांभीर्य दिसत नाही.
बहुतांश गावांमध्ये अनेकांच्या तोंडाला मास्क दिसत नाही किंवा तेथे सामाजिक अंतरही पाळले जात नाही. ग्रामपंचायतींनी स्थानिक शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत गावस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस पाटील आदींच्या माध्यमातून समिती स्थापन करून बाहेरगावाहून आलेल्या तसेच कोरोना विषाणूची लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवणे व ही माहिती वरिष्ठ पातळीवर कळवणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन
सद्यस्थितीत कोरोना विषाणूंच्या संसर्गाची व्याप्ती वाढतच आहे. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात थांबण्याची गरज आहे. मात्र अनेकजण मुख्यालयी राहत नाहीत. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही त्याचे उल्लंघन होत आहे.
"कोरोना'चा संसर्ग पाहता अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या काम करण्यालाही काही प्रमाणात मर्यादा आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासनाचे नियोजन सुरुच आहे.
- नानासाहेब आगळे, तहसीलदार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.