राहुरी (अहमदनगर) : राज्यातील सहकारी साखर कारखाने बंद करुन, 25 कारखाने विकत घेणारे एकच कुटुंब आहे. परंतु, जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे, तोपर्यंत तनपुरे कारखान्याचे खासगीकरण होऊ देणार नाही. निवडणुकीत परिवर्तन मंडळाला सभासद शेतकऱ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या ऑनलाइन वार्षिक सभेत खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे होते. माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, शिवाजी सोनवणे, कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे उपस्थित होते. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, तनपुरे कारखाना चालविण्यासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची मदत लाभली. आज दोन लाख टन गाळप झाले. त्याचा आनंद आहे. नेतृत्व असेल, तर कामगारांची साथ लाभते, हे सिद्ध झाले. 30 एप्रिलपर्यंत हंगाम चालेल.
अध्यक्ष ढोकणे म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या कर्जाचे दहा कोटी रुपये व एफआरपी दिला. प्रतिदिन साडेतीन हजार टन ऊस गाळप सुरू आहे. प्रवरा कारखान्याच्या ऊस तोडणी यंत्रणेमुळे हंगाम यशस्वी होत आहे. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश वाबळे, बाबा देशमुख, अनिल शिरसाठ, वसंत कोळसे, अण्णासाहेब बाचकर यांनी चर्चेत भाग घेतला. संचालक महेश पाटील यांनी आभार मानले.
सुपारी घेणाऱ्यांनी शिकवू नये
मागील संचालक मंडळाने थकविलेला बारा कोटी रुपयांचा एफआरपी दिला. त्यामुळे कामगारांची देणी राहिली. ज्यांनी उसाचे टिपरू दिले नाही, त्यांनी उसापोटी लाखो रुपयांची उचल घेऊन ती भरलीच नाही. अशा सुपारी घेऊन बोलणाऱ्यांनी शहाणपणा शिकवू नये, असेही डॉ. विखे पाटील यांनी ठणकावले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.