राहुरी (जि. नगर) : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगडावर पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. आज (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजता लहीत खुर्द (कोतूळ) येथे मुळा नदीपात्रातून नऊ हजार ३९३ क्यूसेकने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणसाठा १४ हजार ८९७ दशलक्ष घनफूट (५७.२९ टक्के) झाला आहे. (Mula dam is 57 per cent full due to incessant rains in the catchment area)
मागील दहा दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे पाणलोटातील ओढे-नाले वाहते झाले आहेत. सर्व बंधारे व छोटी धरणे पूर्ण क्षमतेने भरून, ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे धरणसाठा झपाट्याने वाढत आहे. मुळा नदीच्या उगमस्थानी हरिश्चंद्रगड ते कोतूळदरम्यान काल (गुरुवारी) दिवसभर संततधार सुरू होती. कोतूळ येथे चार मिलिमीटर पाऊस झाला. कोतूळ ते मुळा धरणादरम्यान पावसाने विश्रांती घेतली. कोतूळ येथून आज सकाळी सहा वाजता १० हजार २६ क्यूसेकने, तर दुपारी बारा वाजता १० हजार ३२० क्यूसेकने धरणात पाण्याची आवक सुरू होती.
मागील वर्षी आजच्या तारखेला धरणसाठा ११ हजार १०२ दशलक्ष घनफूट होता. त्या तुलनेत यंदा तीन हजार ७९५ दशलक्ष घनफूट पाणी जास्त आहे. धरण परिचलन सूचीनुसार १५ ऑगस्टपर्यंत धरणसाठा २२ हजार ६८० दशलक्ष घनफूट स्थिर ठेवून, नव्याने येणारे पाणी धरणातून नदीपात्रात सोडले जाईल.
१६ ते ३१ ऑगस्टदरम्यान धरणसाठा २५ हजार ४३८ दशलक्ष घनफूट स्थिर ठेवून, उर्वरित पाणी नदीपात्रात सोडले जाईल. एक सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान धरणसाठा २५ हजार ४३८ दशलक्ष घनफूट स्थिर ठेवला जाईल. १५ ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने २६ हजार दशलक्ष घनफूट भरले जाईल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.