
कर्जत: मंगलाष्टकांनंतर डोईवर अक्षता पडताच नवरीने वरमाला घातली. फटाक्यांची आतिषबाजी झाली.पाहुणे मंडळींनी स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. नवरी घरात लक्ष्मीच्या पावलाने येणार म्हणल्यावर सासरच्या मंडळींनी तिचं स्वागत केलं. देवदेवही करून झाले. मिलनाची रात्र आली नि अघटित घडलं. तो प्रकार पाहून नवरदेवाच्या पायाखालची वाळूच सरकली.
तालुक्यातील एका गावातील लग्नाळूसोबत हे घडलं असलं तरी ते तुमच्याबाबतही घडू शकतं.
तर ती कथा अशी आहे ... एका गावातील तरूणाचं लग्न करायचं होतं. त्याला एका मुलीचं स्थळ सांगून आलं. कोणी तरी एक मध्यस्थ होता. त्याने बोलाचाली केली. व्यवहारही ठरला. मग लग्नाबाबत ठरलं. नवरी होती पल्लवी सगट. मंगलबाई वाघ तिची मावशी झाली. तिने जावयाकडून दोन लाख दहा हजार रुपये घेतले. मंदिरात मोजक्याच लोकांसोबत लग्न लावून दिले.
लग्नानंतर देवादिकांचा आशीर्वादही घेतला. सोळावा झाल्यानंतर सुहाग रातीचा पलंग सजवण्यात आला. नवऱ्या मुलीच्या पोटात कळ आली. त्यामुळे ती घराबाहेर पडली. नवरदेवाच्या घरी स्वच्छतागृह नसल्याने ती बाहेर गेली असावी, असा नवरदेवाने अंदाज बांधला. दहा मिनिटे झाली, पंधरा मिनिटेही उलटली. अर्धा तासाकडे घड्याळ सरकू लागले. एकेक मिनिट नवरदेवाला अस्वस्थ करू लागला. नाईलाजाने त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बाहेर लॉक होता. मग त्याने आवाज देऊन घरातील मंडळांना जागे केले. त्यानंतर त्यांनी नवरीचा शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेऊनही नवरी सापडली नाही. त्यानंतर त्यांनी ओळखून घेतले. घरातील किडूकमिडूकही तिने लांबवले होते.
या प्रकरणी तक्रार दाखल होताच कर्जत पोलिसांनी टोळीचा छडा लावला. दोन महिलांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. या मध्ये राजू वैजनाथ हिवाळे (सिंहगड रोड पुणे), विलास जोजरे (रा. हिंगोली), मंगलबाई दत्तात्रय वाघ (रा पोखरणें, सोनपेठ परभणी) आणि पल्लवी गोमाजी सगट (रा. मोहाला सोनपेठ परभणी) यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस सब इन्स्पेक्टर भगवान शिरसाठ, पोलिस जवान मारुती काळे, तुळशीदास सातपुते, सागर म्हेत्रे, भाऊ काळे, गणेश भागडे, ठोंबरे, संपत शिंदे यांच्या टीम त्या टोळीच्या मागावर होती. त्यांनी ही टोळी जेरबंद केल्याने अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होण्यापासून बचावले. या नवऱ्या मुलीने अगोदर तीनजणांना फसवल्याचं समोर आलं आहे.
हल्ली बऱ्याच मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. त्यामुळे आंतरजातीय का होईना नवरी घरात आणण्याकडे लोकांचा कल आहे. त्यातून फसवणुकीचे प्रकार घडतात. अनेक लग्नात मुलगाच मुलीला हुंडा देतो. येथेही असेच झाले.
खात्री करूनच लग्न लावले पाहिजे. अशा प्रकारे घाई गडबडीत लग्न लावून देण्याऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. लग्नात काही एजन्ट असल्यास व गैरप्रकार घडत असल्यास पोलिसांशी संपर्क करावा.
-चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक,कर्जत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.