कुणीच विचारीना राव.. कोरोनाने नेत्यांची सद्दी संपवली

No one invited political leaders to the program
No one invited political leaders to the program

श्रीगोंदे : नेते असल्याशिवाय तालुक्‍यात कुठलेही काम अपूर्णच राहते. "दादा,' "काका,' "अण्णा,' "साहेब,' "तात्या,' "भाऊ' अशी टोपणनावे असणारे नेते आल्याशिवाय कार्यकर्त्यांचे पानही हलत नव्हते. विवाह असला, तर हे नेते आल्याशिवाय वर-वधूंच्या डोक्‍यावर अक्षताच पडत नव्हत्या. दु:खाच्या क्षणीही नेते हवेतच, यासाठी फोनवर फोन सुरू असत. मात्र, कोरोनाचे संकट आल्यापासून गेल्या तीन-चार महिन्यांत या नेत्यांना कोणीही विचारत नाही. आनंदाच्या क्षणी नेत्यांना वेगळी आणि जवळच्या लोकांना वेगळी वेळ दिली जाते. दु:खात तर कोणीच वाट पाहत नाही. 

विवाह, साखरपुडा, वाढदिवसाच्या आनंदाच्या, तसेच अंत्यविधी, दशक्रिया विधी अशा दु:खाच्या प्रसंगी नेते आल्याशिवाय कार्यच पूर्ण होत नव्हते. अनेकांच्या विवाहात त्यांचे नेते, म्हणजेच मुख्य वऱ्हाडी असल्याची जाणीव होत असे. अनेकांना नेते त्यांच्या कार्यक्रमांना हवेच असत. विरोधी नेत्यांनीही यावे, यासाठी अनेक जण फिल्डिंग लावत असल्याचे चित्र अनेक वेळा श्रीगोंदेकरांनी अनुभवले. 

कोरोना, प्रशासनाचीही भीती 

विवाहातील आशीर्वाद आणि दु:खद घटनांतील श्रद्धांजलीची भाषणे करण्यात येथील नेत्यांचा हात कुणीच धरणार नाही. कार्यक्रमात नामोल्लेख राहिला, तरी अनेक जण दुखावले जातात, तर आलेला नेता वा प्रमुख नाव घ्यायचे राहू नये, यासाठी संयोजकांची घाई सुरू असते. येथील या प्रथेला जिल्ह्याबाहेरील लोक कमालीचे वैतागले, तरी येथील लोकांना व नेत्यांना त्याची अजिबात फिकीर नव्हती. मात्र, हा सगळा आता भूतकाळ झाला. कोरोना आला आणि कार्यकर्त्यांच्या मनातील नेत्यांची जागा कोरोना व प्रशासनाच्या भीतीने घेतली. 

नेत्यांसह कार्यक्रम ठरतोय अपवाद 

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात तर कार्यकर्ता व नेता हे नाते फोनपुरतेच राहिले होते. नंतर विवाह व इतर कार्यक्रमांना अटींवर परवानगी मिळाली; पण त्यात नेत्यांचा वावर अजिबात नको, याची दक्षता कार्यकर्ते घेत आहेत. घरातील कार्य असले तरी नेत्यांना बोलवायचे की नाही, यावर चर्चा होते. काही महिन्यांपूर्वी नेत्यांशिवाय कार्यक्रम म्हणजे अपवाद होता, आता नेते आलेला कार्यक्रम अपवाद ठरतो आहे. 

राजकारणातून संपण्याची भीती 

सुरवातीला नेत्यांनाही ही परिस्थिती ठीक वाटली. रोज तेच ते कार्यक्रम करून कंटाळलो होतो. बरे झाले कुणाकडेच जायला नको, असे म्हणून त्यांनी मनाची समजूत घातली. मात्र, आता आपल्याला कोणी बोलाविणारच नाही, मग राजकारणातील चर्चेत कसे राहायचे, अशी शंका येऊ लागल्याने, किरकोळ कार्यक्रमालाही (न बोलावता) सगळेच नेते एकत्र दिसत असल्याचे चित्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com