नगर ः कांद्याच्या भावात चढ-उतार नेहमीच होतात; मात्र सध्या काही ठिकाणी एखाद्-दोन कांदागोण्यांना चांगला भाव मिळाला, की "त्या'च्या पट्ट्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. कांद्याचा भाव वाढल्याचा आभास निर्माण केला जातो. परिणामी, चांगल्या भावाच्या आशेने शेतकरी जास्त माल विक्रीस आणतात आणि फसतात. मालाची आवक वाढताच भाव पाडले जातात. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येते.
कांद्याचे भाव अचानक वाढणे वा कमी होणे, हा प्रकार तसा नित्याचाच; परंतु तो कशामुळे होतो, याचे कोडे अजून शेतकऱ्यांना सुटलेले नाही. बाजारात कांदा आल्यावर काही व्यापारी मोजक्याच शेतकऱ्यांच्या 10-20 गोण्यांना चांगला भाव देतात. त्यातून कांद्याचे भाव वाढल्याचे चित्र निर्माण होते.
सोशल मीडियातून ते गावोगावी पसरते. त्यातून भाव वाढल्याचा आभास निर्माण होऊन शेतकरी चांगल्या भावाच्या अपेक्षेने आपलाही कांदा बाजारात आणतात आणि भावात घसरण सुरू होते.
शेतकरी आक्रमक होतात. लिलाव बंद पाडण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. काही व्यापारी आपले हित साधण्यासाठी, तसेच साठेबाजीसाठी असे प्रकार करतात. मात्र, त्यात होरपळ होते ती सामान्य शेतकऱ्यांचीच. त्यामुळे बाजार समित्यांनी लिलावाच्या भावाची माहिती देताना, जादा भाव निघालेल्या कांद्याच्या किती गोण्यांची विक्री झाली, याचीही माहिती देणे आवश्यक आहे. त्यातून कांद्याचा सरासरी भाव काढल्यास भाववाढीचा भडका थांबण्यास मदत होऊन, शेतकऱ्यांवरही आंदोलनाची वेळ येणार नाही.
सध्याही कांद्याला सरासरी साडेसात हजार रुपये क्विंटल भाव आहे. मात्र, काही ठिकाणी मोजक्या कांद्याची 12 हजार रुपये क्विंटलने विक्री झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांकडून लिलाव बंद पाडण्याच्या घटना होत आहेत.
भाववाढीची शक्यता
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातच नव्हे, तर अन्य राज्यांतही लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातून पीक गेले. त्यामुळे कांदाउत्पादन कमी झाले असून, चाळींमध्ये साठवून ठेवलेल्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
कांद्याच्या भावात चढ-उतार होणे साहजिक असले, तरी मोजक्याच कांद्याला जादा भाव देऊन आवक वाढविण्याचा, साठेबाजी करण्याचा प्रकार चुकीचा आहे. असा प्रकार करून शेतकऱ्यांच्या भावनांसोबत खेळू नये.
- प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेरसंपादन - अशोक निंबाळकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.