कोपरगाव (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या बाजारपेठेची अस्थिरता नष्ट होऊन आर्थिक चालना मिळण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील व्यापारी, छोटे व्यवसायिक यांच्याकडून वस्तूंची खरेदी करून त्यांची ही दिवाळी गोड करावी, अशी भावनिक साद शहरवासीयांना नगरसेवक तथा माजी बांधकाम समिती सभापती जनार्दन कदम यांनी घातली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीसाठी पत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हंटले की, मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊन काळात शहरातील व तालुक्यातील संपूर्ण उद्योगधंदे बाजारपेठ व छोटे मोठे व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम दिसून आला. शहरातील व ग्रामीण भागातील व्यवसायाच्या दृष्टीने आर्थिक परिस्थितीमध्ये बदल झाले. त्यामुळे शहरातील बाजारपेठ ठप्प झाली. लोकांचा व्यवसाय बंद असल्याने छोटे व्यावसायिक फळे, भाजी विक्रेते तसेच हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची जगण्यासाठी धडपड सुरु होती. या परिस्थितीत अनेक मजूर व हातावर पोट भरणारे कुटुंब यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते. दरम्यान कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशन, लायन्स क्लब व इतर सामाजिक संस्था यांनी लॉकडाऊन काळात सुमारे दोन महिने गरीब व गरजू लोकांना मोफत घरपोच जेवण व किराणा सामान पुरविण्याचे काम केले.
शहरातील व तालुक्यातील बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. तिला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या आपल्या बाजारपेठेतील व्यापार्यांकडून येणाऱ्या दीपावली सणाची आवश्यक वस्तूंची खरेदी करावी व आपल्या शहरात कोरोना काळात सामाजिक दायित्व निभावणाऱ्या शहरातील व तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांकडून करून कोरोना काळात मोडकळीस आलेल्या बाजारपेठेतच पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्यवहार करून बाजारपेठ भक्कम बनवण्याचे आवाहन जनार्दन कदम यांनी केले.
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.