संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याल्या गावाने लोकसहभागातून बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्याची भिंत अतिवृष्टीमुळे ढासळण्यास सुरवात झाली आहे.
संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावाच्या हद्दीत मोठेबाबा वाडी परिसरात, कऱ्हे घाटातील खंडोबा मंदिराच्या परिसरातील सखाहरी गुळवे यांच्या खासगी क्षेत्रातील जमीनीवर सुमारे 60 ते 70 वर्षांपूर्वी मातीचा साठवण बंधारा बांधला होता. मागील वर्षी पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेच्या निमित्ताने, ग्रामस्थांनी लोकसहभागातून श्रमदान करुन या बंधाऱ्याची उंच वाढवली होती. बंधाऱ्याच्या सुमारे 30 फुट उंचीच्या मातीच्या भिंतीची लांबी सुमारे 182 फुट आहे. सुमारे 20 एकर क्षेत्रात या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा विस्तार झाला आहे.
शुक्रवारी तालुक्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीचा परिणाम म्हणून या बंधाऱ्यात एकाएकी मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला. मात्र पावसामुळे बंधाऱ्याच्या मातीच्या भिंतीला बाहेरच्या बाजूला भगदाड पडण्यास सुरवात झाली आहे. ग्रामस्थांनी या प्रकाराची माहिती प्रशासनाला दिली मात्र त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने, ग्रामस्थांनी जेसीबीने बंधाऱ्याच्या सांडीमध्ये चर खोदून पाणी काढून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे पाणी कमी होण्याबरोबर साठलेले पाणी वाया जाणार असल्याने, ग्रामस्थांनी पोकलेन व इतर सामुग्रीनिशी बंधाऱ्याचे भगदाड बुजवण्याच्या कामाला सुरवात केली आहे.
या बंधाऱ्याला गळती लागून फुटल्यास ओढ्यातून खाली वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे तीन किलोमीटरपर्यंतच्या शेतकऱ्यांची पिके, शेतजमिन, गोठे, रहिवाशी घरे यांनी हानी होण्याची शक्यता आहे.
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.