पाथर्डी : तालुक्यात गतवर्षी अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूसउत्पादक शेतकऱ्यांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विमाकवचासाठी शेतकऱ्यांनी कंपन्यांकडे रक्कम भरली होती. मात्र, त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाई न मिळाल्याने विमा कंपन्यांना जाब विचारू, असा इशारा केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांनी दिला आहे.
गतवर्षीच्या पीकविम्यासंदर्भात ऍड. प्रताप ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ते म्हणाले, ""तालुक्यातील सहा महसूल मंडलांपैकी मिरी मंडल वगळता अन्य पाच मंडलांना कपाशी पीकविम्यातून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.
विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे. टाकळी मानूर, माणिकदौंडी, करंजी, पाथर्डी, कोरडगाव, मिरी अशी सहा महसूल मंडले आहेत. गतवर्षी 10 हजार 924 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे पीक घेण्यात आले. वेचणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे पांढरे सोने काळवंडले.
शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. सहा मंडलांतील 21 हजार 622 शेतकऱ्यांनी सुमारे 2 कोटी रुपये विमा कंपनीकडे भरले होते. मात्र, यातील केवळ मिरी मंडल विमा कंपनीच्या निकषात बसल्याने, 2 हजार 569 शेतकऱ्यांना 1 कोटी 51 लाख 44 हजार रुपये भरपाई मिळाली.
अन्य पाच मंडलांना विम्यातून वगळण्यात आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असून, विमा कंपनीच्या दुजाभावाबाबत स्थानिक यंत्रणांनी दखल घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांसह आम्ही त्यांना जाब विचारू.
संपादन - अशोक निंबाळकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.