'नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य'

हसन मुश्रीफ; जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
hasan mushrif
hasan mushrifsakal

अहमदनगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर लसीकरण वेगाने होईल, यावर प्रशासनाच्या वतीने भर दिला जात आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे ५० लाख डोस नागरिकांना आरोग्य यंत्रणेने दिले आहेत. जिल्ह्यात लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांच्या आरोग्याला शासनाकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

प्रजासत्ताकदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ पालकमंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आपल्यासमोर आहे. रोज रुग्णसंख्या वाढत आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३९ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात २७ पीएसए प्रकल्प कार्यान्वित झाले, तर १६ एलएमओ प्रकल्प सुरू झाले आहेत. २२८ टन ऑक्‍सिजनची निर्मिती यातून होणार आहे. दुसऱ्या लाटेत सर्वोच्च दैनंदिन रुग्णसंख्येसाठी आवश्‍यक असलेल्या ऑक्‍सिजनपेक्षा तिप्पट व्यवस्था आपण उभी करीत आहोत. १२ तालुक्‍यांमध्ये कोरोना केअर सेंटर उभारण्यात आली आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांचा लाभ उपेक्षित व गरजू लाभार्थ्यांना एकाच छताखाली मिळावा, यासाठी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे कामही पूर्ण झाले आहे. लवकरच या इमारतीचे आपण लोकार्पण करणार आहोत.

रस्त्यांची कामे प्रगतिपथावर

जिल्ह्यात एक हजार ५६९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. आशियायी विकास बॅंकेच्या अर्थसाह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६८ ची, जिल्ह्यातील ३३ किलोमीटरची कामे मंजूर झाली आहेत. ग्रामविकास विभागाने नुकतेच ४० हजार किलोमीटर रस्ते इष्टांकापैकी १० हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचे काम हातात घेतले आहे. त्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची बांधणी चांगल्या प्रकारे होऊ शकते, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com