शिर्डी (अहमदनगर) : शेतकऱ्याच्या दुचाकीला लटकवलेली किटली, हे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचे क्रेडीट कार्ड असते. खेड्यातील चलनवलन फिरविण्यात या किटलीतील दुधाचा मोठा वाटा असतो. कोरोनाचे संकट आले, तसे दुधाचे भाव 30 ते 32 रुपये लिटरवरून 18 ते 20 रुपये लिटरपर्यंत घसरले.
दूधउत्पादकांचे, पर्यायाने ग्रामीण भागाचे अर्थकारण गोत्यात आले. नगर जिल्ह्यात दररोज 27 ते 30 लाख लिटर दूधउत्पादन होते. ही बाब लक्षात घेतली, तर उत्पादकांना रोज किती मोठा आर्थिक फटका बसतो, हे लक्षात येईल.
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात दूधउत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देऊन आधार देण्यात आला. या काळात कधी नव्हे ते उत्पादकांना 30 ऐवजी 35 रुपये प्रतिलिटर भाव मिळाला. सुखाचे, समृद्धीचे दिवस येण्याची चाहूल लागली. मात्र, कोरोना आणि लाकडाऊनमुळे त्यांच्या आशा-आकांक्षावर पाणी फिरले. या संकटात उत्पादकांचे डोळे सरकारच्या मदतीकडे होते. मात्र, कोरोनामुळे सरकारच आर्थिक अडचणीत सापडले आहे.
उत्पादित दुधापैकी 80 टक्के दुधापासून उपपदार्थ तयार होतात. सध्या सभा, समारंभ, विवाह सोहळे, उपहारगृहे बंद आहेत. परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने घरी परतले आहेत. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांचा खप कमी झाला. रोजच्या दुधाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला.
अशा काळात दुधाचे भाव घसरले, तरी शहरातील ग्राहकांसाठी दूध स्वस्त झालेले नाही. हे चकित करणारे नेहमीचे चित्र सध्याही पाहायला मिळते. दूधवितरणाच्या साखळीत किरकोळीने दूधपिशव्या विकणारा दुकानदार सर्वाधिक नफा कमावतो. त्यानंतर त्याला माल पुरविणारा ठोक विक्रेत्याचा क्रमांक लागतो. त्यांच्यावर तेजी-मंदीचा फारसा परिणाम होत नाही. असे अचानक निर्माण होणारे आर्थिक पेचप्रसंग वगळता, खासगी दूधसंघही नफ्यात असतात.
विशेष म्हणजे, राज्यात जी मातब्बर मंडळी सहकारी दूध संघ चालवितात. त्यातील अनेक जण खासगी दूधसंघाचे मालक आहेत. त्यामुळे सरकारात निर्णय घेणारे आणि त्याचा लाभ घेणारे, अशा दोन्ही भूमिका ते वर्षांनुवर्षे सहज पार पाडत आहेत. दूधउत्पादकांच्या नावे जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ या मंडळींना अधिक झाल्याची उदाहरणे यापूर्वी पाहायला मिळाली. मात्र, उत्पादक होता तेथेच आहे.
सध्या दूधउत्पादक लिटरमागे 12 रुपयांचा तोटा सहन करीत आहेत. सरकारने त्यांना मदतीचा हात दिला नाही, तर ते फार काळ तग धरू शकणार नाहीत. उत्पादकांनी त्यांच्याजवळील संकरित गायी विकण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे गायींचे भावही 50 टक्क्यांनी घसरले आहेत. या कठीण काळात शेतकऱ्यांजवळील गोधन कमी झाले, तर त्याचे दूरगामी परिणाम या व्यवसायावर होतील.
दुधाला उठाव नसल्याने उत्पादक अडचणीत सापडले. पशूखाद्यासह उत्पादनखर्चात वाढ झाली. दूधदर कमी झाल्याने रोजचा तोटा शेतकरी सहन करू शकणार नाहीत.
- सुनील सदाफळ, अध्यक्ष, पंचकृष्णा डेअरी, राहाताशेतकऱ्याला दूधधंद्याचा एकमेव आधार होता. आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी, या संकटाचा फार काळ मुकाबला करू शकणार नाही. त्याला तातडीने आर्थिक आधाराची गरज आहे. कोरोनामुळे शेतीला चोहोबाजूने फटका बसला आहे.
- मच्छिंद्र टेके, दूध व्यवसायातील जाणकार
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.