इंधनक्रांतीत कोल्हे कारखान्याचे पहिले पाऊल

उसाच्या फडात पेट्रोल (इथेनाॅल) तयार होणार, त्यावर वाहने धावणार व उसाला अधिक भाव मिळणार
इंधनक्रांतीत कोल्हे कारखान्याचे पहिले पाऊल
इंधनक्रांतीत कोल्हे कारखान्याचे पहिले पाऊल

शिर्डी : उसाच्या फडात पेट्रोल (इथेनाॅल) तयार होणार, त्यावर वाहने धावणार व उसाला अधिक भाव मिळणार. हे केंद्रातील मोदी सरकारचे स्वप्न कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने प्रत्यक्षात आणले. या कारखान्याने नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे थेट उसाच्या रसापासून इथेनाॅल निर्मिती केली. ऊस उत्पादकांना एफआरपीच्या तुलनेत प्रतिटन तीनशे रूपये दर अधिक दिला. मात्र देशाचा इंधन स्वयंपूर्णता बहाल करून अर्थव्यवस्था मजबूत करण्याची क्षमता असलेल्या या इंधनक्रांतीसमोर अनेक अडथळे पार करण्याचे आव्हान उभे आहे.

या नियोजित इंधन क्रांतीची महती काल नगर येथील एका कार्यक्रमात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी कथन केली. तथापी इथेनाॅलच्या पंपाच्या उभारणीपासून ते त्याचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांसमोरील अनेक अडचणी दूर करण्याचे आवाहन केंद्र व राज्य सरकारला स्वीकारावे लागणार आहे. इथेनाॅल खरेदीची हमी व शाश्वत भाव केंद्र सरकाने बांधून दिले. तथापी साखर वर्तूळात इथेनाॅल प्लॅंटची उभारणी म्हणजे ‘दमडीची कोंबडी आणि रूपयाचा मसाला’ असे गमतीने म्हटले जाते. कारण इथेनाॅल निर्मिती प्लॅंटला साधारण चार कोटीचा खर्च येतो. त्याचे प्रदूषण रोखण्यासाठी जो इन्सिरेशन बाॅयलर उभारावा लागतो, त्याची किंमत आहे चाळीस कोटी रूपये. याचा अर्थ असा की जिल्ह्यातील सर्व इथेनाॅल प्रकल्पांना मध्यवर्ती ठरेल, असे इन्सिरेशन बाॅयलर केंद्र व राज्य सरकारला उभारून द्यावे लागतील.

हे काम कारखान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे. त्यातही आणखी एक अडचण अशी की इथेनाॅल प्लॅंट सलग तीस वर्षे उत्तम चालतो. मात्र हा इन्सिरेशन बॉयलर तीन वर्षात खराब होतो. तेल कंपन्यांकडे इथेनाॅल साठविण्याची पुरेशी क्षमता नाही. त्यामुळे कारखान्यांचे इथेनाॅलने भरलेले टॅंकर त्यांच्या तेल डेपोसमोर दोन ते तीन दिवस उभे रहातात. खर्चाचा ताळमेळ बसत नाही. तेल कंपन्यांनी इथेनाॅल साठवण क्षमता युध्दपातळीवर वाढविणे गरजेचे आहे. साठवण क्षमता पुरेशी झाली व इन्सिरेशन बाॅयलर सरकारने उभे करून दिले तरच इथेनाॅल निर्मितीला वेग येऊ शकेल.

जे कारखाने जुन्या तंत्रज्ञानावर आधारीत असलेल्या यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने गाळप करतात त्यांच्यापुढे तर आणखी वेगळ्याच अडचणी आहेत. ज्या कारखान्यांकडे आसवनी प्रकल्प आहेत. त्यांना इथेनाॅल निर्मितीकडे वळणे तुलनेत सोयीचे आहे. तथापी इथेनाॅल निर्मितीवर भर दिला तर शेतकऱ्यांना सध्याच्या भावाच्या तुलनेत अधिक भाव देणे शक्य आहे. तसेच कारखान्यांवर चढणारा कर्जाचा डोंगर दूर होण्याची खात्री आहे. केंद्र व सरकारने त्यासाठी अनुकूल धोरण घेतल्यास सर्वाधिक इथेनाॅल निर्मिती करणारा महाराष्ट्र देशाला इंधन स्वयंपूर्णता बहाल करण्यास आगामी काळात महत्वाची भूमिका बजावेल.

"आमच्या कारखान्याने नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे थेट उसाच्या रसापासून इथेनाॅल निर्मिती केली. एकूण गाळपाच्या तुलनेत ही प्रमाण वीस टक्के आहे. ‘सकाळ’ने त्यास सविस्तर प्रसिध्दी दिली. त्यामुळे राज्य व देशपातळीवर हा चर्चेचा विषय झाला. बऱ्याच कारखान्यांच्या शिष्टमंडळांनी आमच्या प्लॅंटला भेट दिली. मागील वर्षी आम्ही ८० लाख लिटर इथेनाॅल म्हणजेच एका अर्थाने पेट्रोल निर्मिती करून मोदी सरकारच्या इंधन क्रांतीत महत्वाची भूमिका बजावली. आगामी काळात ही इंधन क्रांती देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी देईल. यातून नवी अर्थक्रांती जन्माला येईल."

-बिपीन कोल्हे, अध्यक्ष, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना, कोपरगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com