मराठा क्रांती मोर्चात जमलेल्या कोट्यवधी रूपयांचे काय झालं?

money
moneysystem

अहमदनगर ः मराठा आरक्षण (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्याने महाराष्ट्राचे समाजकारण आणि राजकारण ढवळून निघाले आहे. मराठा समाजाच्या संघटनांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. सत्ताधारी सावध भूमिका घेऊ लागलेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील पाच वर्षांत चर्चेला आला असला तरी ही पिढ्यान पिढ्याची ही मागणी आहे.

कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील (Kopardi) अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला. विशेषतः तरूणांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यातून मराठा क्रांती मोर्चे (Maratha kranti Morcha) निघाले. अत्याचार करणाऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसोबतच आरक्षण ही प्रमुख मागणी होती. औरंगाबाद, बीड असे करीत राज्यातील सर्व जिल्ह्यात हे मोर्चे निघाले. परदेशातही ते पहायला मिळाले.(Sakal Maratha Samaj will set up a hostel for students)

या मोर्चामुळे तरूण एकत्र आला. गरिबी आणि नोकरीतील आरक्षणाअभावी होणारी परवड त्याला कारणीभूत ठरली. मोर्चे काढताना समाजातील लोकांनी वर्गणीही दिली. राजकीय नेत्यांवर लोकांचा रोष होता. त्यांनीही त्यात हातभार लावला. नगर शहरात निघालेला दहा ते बारा लाखांचा मोर्चा अविस्मरणीय होता.

या मोर्चाच्या नियोजनासाठी कोट्यवधी रूपये जमले. सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी त्याचे नियोजन केले होते. मोर्चासाठी खर्च करून तब्बल एक कोटी रूपये उरले. गेल्या चार वर्षांत या पैशांबाबत दबक्या आवाजात चर्चा होत राहिली. इतक्या मोठ्या रकमेचे नेमके काय झाले...

money
पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांच्या घरावर मोर्चा काढत विचारणार जाब, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

मराठा मोर्चाचे शिलेदार गेले

सकल मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये उद्योजक बाळासाहेब पवार, नगरसेवक कैलास गिरवले यांचा समावेश होता. त्यांच्याबद्दल समाजाला आस्था होती. त्यांनी मोर्चाच्या नियोजनात हिरीरिने भाग घेतला होता. त्यांच्या निधनानंतर पैशाचा मुद्दा उपस्थित केला जाऊ लागला. परंतु सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी ट्रस्ट स्थापन करून एकविचाराने ही रक्कम बँकेत ठेवली आहे. युनियन बँकेत ते खाते आहे. समाजाने दिलेल्या एकाही पैशाचा गैरवापर झालेला नाही, असं समन्वयक सांगतात.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

मराठा समाजातील गरीब गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा सकल मराठा समाजाच्या नेत्यांचा मानस आहे. त्यासाठीच हे पैसे वापरले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांची नगरमध्ये मोफत निवासव्यवस्था केली जाणार आहे. किमान ५०० विद्यार्थ्यांसाठी ही सोय आहे. पोलिस भरती, युपीएससी, एमपीएससी किंवा अन्य भरतीबाबत या केंद्रातून मार्गदर्शन केले जाईल. अॉनलाईन पद्धतीने त्यांना तज्ज्ञ प्राध्यापकांची शिकवणी उपलब्ध करून दिली जाईल. विद्यार्थ्याने केवळ त्याच्या भोजनाचा खर्च उचलायचा आहे. या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी किमान पाच कोटी रूपयांची आवश्यकता आहे.

नगर महापालिकेकडून मदत

मराठा समाजाच्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी जागेची आवश्यकता आहे. ती मिळत नसल्यानेच प्रकल्प रखडला होता. नगर महापालिकेकडे जागेची मागणी केली आहे. आमदार संग्राम जगताप (Mla Sangaram jagtap) व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडून तसे प्रयत्न सुरू आहेत. या होस्टेलसाठी किमान अर्धा एकर जागेची गरज आहे.

येत्या सर्वसाधारण सभेत ती जागा मिळण्याची शक्यता सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी बोलून दाखवली. जागा मिळाल्यास या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उभारणीस गती येईल. एकाही पैशाचा अपव्यय किंवा गैरवापर झालेला नाही, अशी माहिती समाजाच्या नेत्यांनी "ई-सकाळ"सोबत बोलताना दिली. (Sakal Maratha Samaj will set up a hostel for students)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com