त्यांचे कुटुंबीयांसह घरातच उपोषण सुरू 

त्यांचे कुटुंबीयांसह घरातच उपोषण
त्यांचे कुटुंबीयांसह घरातच उपोषण

श्रीरामपूर ः राज्यातील विनाअनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांना संपूर्ण पगार करावा तसेच अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने राज्याचे अध्यक्ष प्रा. तान्हाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यासह राज्यातील प्राध्यापकांनी सोमवार (ता. 11) पासून आपल्या कुटुंबीयांसह घरातच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. संघटनेच्या महिला राज्य अध्यक्ष प्रा. सुनीता गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने याप्रकारे आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक सुमारे वीस वर्षांपासून बिनपगारी विद्यादानाचे काम करीत आहेत. आज ना उद्या शासन न्याय देईल, अशी त्यांना आशा आहे. सन 2009 पासून प्राध्यापकांची सुमारे अडीचशे आंदोलने झाली. त्याचा परिणाम म्हणून सन 2014 मध्ये "कायम' शब्द काढून टाकण्यात आला. सन 2019 मध्ये सर्व महाविद्यालयांची चौकशी करून पात्र यादी घोषित करण्यात आली; परंतु किरकोळ त्रुटींमुळे अनेक महाविद्यालये त्यात अपात्र ठरविली गेली. त्या महाविद्यालयांकडून त्रुटींची पूर्तता केली असताना अद्याप त्यांना पात्र घोषित केलेले नाही. 

वीटभट्टीसह गवंडीकामाची प्राध्यापकांवर वेळ 
त्यामुळे काही शिक्षकांना महाविद्यालयातून घरी आल्यावर दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणे, गवंडीकाम करणे, रिक्षा चालवणे, चहा दुकान चालवणे, वीटभट्टीवर काम करणे, टेलर काम करणे, अशी कामे करण्याची वेळ आली आहे. काही शिक्षकांना आपल्या हाताखाली जे विद्यार्थी शिकले आहेत, त्यांच्याच शेतात कामाला जावे लागत आहे. सुमारे वीस वर्षांपासून अशाच विदारक परिस्थितीमध्ये शिक्षक जीवन जगत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या परिस्थितीचा विचार करता सर्व प्राध्यापकांच्या खात्यात ऑफलाईन पगार सुरू करावा. तसेच जी महाविद्यालये अघोषित आहेत, त्यांना घोषित करून त्यांच्या खात्यावरही ऑफलाईन पगार देण्यात यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

प्राध्यापकांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबईत भर उन्हात आंदोलनप्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या आहेत. परंतु शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात घरबसल्या उपोषण सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात शासनाने गांभीर्याने विचार करून प्राध्यापकांचे प्रश्न सोडविले नाहीत, तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रा. गायकवाड, जिल्हाध्यक्ष सचिन पालवे, प्रा. उमादेवी शेळके, प्रा. अबू इनामदार, प्रा. सुभाष चिंधे, प्रा. बाळासाहेब गुंजाळ, प्रा. संजय बाबर यांनी दिला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com