
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगारविरोधी काळ्या कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी 26 नोव्हेंबरपासून एकवटले आहेत.
संगमनेर (अहमदनगर) : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगारविरोधी काळ्या कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी 26 नोव्हेंबरपासून एकवटले आहेत. थंडी-वाऱ्याला तोंड देत चिकाटीने लढा देणाऱ्या 20 आंदोलक शेतकऱ्यांचा यात मृत्यू झाला.
दरम्यान, संत बाबा रामसिंग यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे नैराश्य आल्याबाबत चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. या आंदोलकांना रविवारी (ता. 20) शहरातील बसस्थानकासमोरच्या महात्मा गांधींच्या प्रतिमेजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
किसान संघर्ष समितीच्या वतीने सकाळी 10 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साथी शिवाजी गायकवाड, कम्युनिस्ट कार्यकर्ते अनिल गुंजाळ, अनिल कढणे, ऍड. निशा शिवूरकर आदींनी केले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर