संगमनेर (जि. नगर) : ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाले असले, तरी स्वराज्य अद्यापही मिळालेले नाही. त्यासाठी क्रांतीची चळवळ सुरू ठेवावी लागेल,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.
‘जयहिंद लोकचळवळ’च्या वतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत ‘सरदार वल्लभभाई पटेल’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना गांधी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘देशात सध्या द्वेष व भेदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मद्वेषाचे राजकारण करीत स्वराज्य निर्माण करणे अवघड आहे. समाजातील सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे, भेदाच्या भिंती उंचावू पाहणाऱ्यांना संधी मिळते आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कामात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. वर्तमानात नेतृत्वाच्या नावावर सौदेबाजी केली जात आहे. लोकांमध्ये भेद निर्माण करून सत्ता उपभोगण्याचे काम सुरू आहे.’’ इंग्रजांप्रमाणे राज्य करण्याचा हा निर्णय देशासाठी घातक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
युवकांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करणे व सुदृढ लोकशाहीसाठी नीतिमूल्यांचे जतन करण्याची आवश्यकता आहे. ‘जयहिंद लोकचळवळ’च्या माध्यमातून समाजबांधणीचे काम होत असल्याचे, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी सांगितले. या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, हिरालाल पगडाल, ॲड. समीर लामखडे, बंटी साळवे आदी ऑनलाइन उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संकेत मुनोत यांनी केले.
इतिहास भ्रष्ट करण्याचा प्रयत्न
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात योगदान दिलेल्या राष्ट्रपुरुषांचे चरित्र जाणून घेण्याची आवश्यकता आहे. सरदार पटेल धर्मनिरपेक्ष, सक्षम व द्रष्टे नेतृत्व होते. सध्या काही संघटना भारतीय इतिहास भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, सत्य कधीच बदलावे लागत नाही, ही सत्याची मोठी शक्ती आहे, असे यावेळी तुषार गांधी म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.