कर्जत (अहमदनगर) : जलयुक्त शिवार योजनेमुळे कर्जत तालुक्यामध्ये जलक्रांती होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झाला आहे. या योजनेतील कामांचे फायदे हे चिरकाल दिसतील, असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील घुमरी येथे बोलताना केले.
तालुक्यातील उत्तर भागामध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक गावातील बंधारे नद्या नाले ओढे पूर्णपणे भरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्रा.शिंदे यांचे हस्ते मिरजगाव परिसरातील विविध गावांतील साठवण बंधाऱ्यातील जलपूजन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, ॲड. शिवाजीराव अनभुले, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, पप्पू धोदाड, संपत बावडकर, शेखर खरमरे, विठ्ठल अनभुले, काका अनारसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
तालुक्यातील घुमरी येथील मन्सूर ओढ्यावरील जलपूजन करून प्रा. शिंदे यांनी बेलगाव, मिरजगाव गूरूपिंपरी, चांदा, मुळेवाडी खांडवी,रवळगाव या परिसरामध्ये जलपूजन व पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
ते म्हणाले जलयुक्त शिवार अभियानात अनेक विकास कामे झाली. त्याचे परिणाम भरलेली नदी आणि ओसंडून वाहणारे बंधारे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आनंद दिसून येत आहे. त्यामुळे मला काम केल्याचे समाधान मिळत आहे. या पाण्यामुळे उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ होणार आहे.
आपण मंत्रिपदाच्या काळामध्ये सर्वसामान्य जनता शेतकरी यांना उपयुक्त अशी सर्व कामे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. तालुक्यात सर्वत्र पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे. जलयुक्त शिवारची कामे तालुक्यात मोठ्या प्रमाणात केल्यामुळे सर्वत्र नाले व बंधारे भरले गेले आहेत. यावेळी नामदेव राऊत, ॲड. शिवाजी अनभुले यांची भाषणे झाली. सचीन पोटरे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.