Winter Session 2023 : अधिवेशनात तनपुरेंचा सरकारवर चौफेर हल्लाबोल; सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, वाळू धोरणांवरही टीका

राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत आरोग्य खात्याच्या निष्क्रिय कारभारामुळे रुग्णांचे मृत्यू तांडव घडले
winter session 2023 prajakt tanpure criticize state govt over health sand policy and other politics
winter session 2023 prajakt tanpure criticize state govt over health sand policy and other politicsSakal

राहुरी : राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था, फसलेले वाळू धोरण व मतदार संघात शेतकऱ्यांचे विद्युत पंप, केबल्स व शेतीमालाच्या चोऱ्या अशा विविध विषयांवर काल (मंगळवारी) विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारवर चौफेर हल्लाबोल केला.

आमदार तनपुरे म्हणाले, राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत आरोग्य खात्याच्या निष्क्रिय कारभारामुळे रुग्णांचे मृत्यू तांडव घडले. नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दोन दिवसांत ४१ रुग्ण दगावले.

त्यात १८ बालकांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत २१ मृत्यू; तर तीन दिवसांत ६३ जणांचा बळी गेला. ठाणे येथे बारा तासांत १८ मृत्यू, छत्रपती संभाजीनगर येथे २४ तासांत १८ मृत्यू झाले शासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर खापर फोडून नाममात्र कारवाई केली.

औषधांचा पुरवठा कमी झाल्याने दुर्घटना वाढत आहेत. औषध पुरवठा करणाऱ्या एमपीपीए संस्थेला आयएएस दर्जाचा अधिकारी नाही. प्रभारी अधिकारी व ७० पैकी केवळ २० कर्मचारी आहेत.

शासनाने वैद्यकीय क्षेत्र व्हेंटिलेटरवर आणले आहे. महाविकास आघाडीच्या काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चांगले काम केले. सरकारला आरोग्यमंत्र्यांना सामान्य जनतेचा जीव गेला, तरी फरक पडत नाही. संवेदना शून्य सरकारच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.

नवीन वाळू धोरणाचे स्वागत केले. परंतु, मतदार संघातील डिग्रस (ता.राहुरी) येथील शासकीय वाळू डेपोला भेट दिल्यावर जनतेच्या समस्या ऐकून वाळू धोरण फसल्याचे दिसले. जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने ठरविलेले वाळू वाहतुकीचे दर न घेता त्याच्या दसपट आकारणी करून, ग्राहकांची लूट केली जात आहे.

त्यासाठी चार-पाच दिवस वाळू लिलावाच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. वाळू वाहतुकीच्या दराच्या बरोबरीने पैसे मोजावे लागतात. त्यामुळे शासकीय वाळूपेक्षा चोरट्या वाळूकडे जनता वळू लागली आहे. त्यावर शासनाने उपाययोजना कराव्यात.

राहुरीत कायदा, सुव्यवस्थेची तीन-तेरा

राहुरी विधानसभा मतदारसंघात चेडगाव येथे तब्बल ३० विद्युत पंपांच्या चोऱ्या झाल्या. त्यावर पोलिस निरीक्षकांनी शेतकरी बोगस तक्रारी करतात, अशी चुकीची उत्तरे दिली. चोऱ्या झालेल्या शेतकऱ्यांच्या नावासह माहिती दिल्यानंतर पोलिस यंत्रणा जागी झाली.

शेतकऱ्यांची उभी व काढलेली पिके चोरी जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. राहुरीला चार वर्षांत आठ पोलिस बदलले. धार्मिक विषयावर दोन पोलिस निरीक्षक निलंबित झाले. मतदारसंघात कायदा व सुव्यवस्थेची तीन-तेरा वाजले आहेत, असेही आमदार तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com