अकाेला : मरणानंतरही भोगाव्या लागतात यातना

वाशीम जिल्हात सर्वच गाव वाडयापाड्यांना आजही परिपूर्ण स्मशानभूमी नाहीत
cemetery
cemetery sakal

रिसोड - मरण यातना सरणावरही पाठ सोडत नाहीत हे दृश्य असंख्य स्मशानांच्या दूरावस्थेतून दिसत आहे. वाशीम जिल्हात सर्वच तालुक्यातील गाव वाडयापाड्यांना आजही परिपूर्ण स्मशानभूमी नाहीत. एवढेच नाही तर अल्पसंख्याक समाजाच्या स्मशानासाठी अधिकृत जागाच नाही. गावकुसाबाहेरील समाजातील व्यक्तीला दुसऱ्याच्या मालकीच्या जागेत अखेरचा निरोप द्यावा लागतो.

काही गावांत प्रत्येक समाजासाठी वेगवेगळी स्मशानभूमी आहे. परंतु स्मशानभूमीच्या दुरवस्थेमुळे अखेरचा प्रवासही खडतर असल्याचे वास्तव समोर आल्याने प्रशासन, संबंधित लोकप्रतीनिधी स्मशानाबाबत गंभीर होतील का? याची प्रतीक्षा आहे. भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यामुळे विकासाच्या बाता मारणाऱ्यांनी किमान अखेरचा प्रवास सुखकर करावा? अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

रिसोड तालुक्यातील केनवडपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गणेशपुर येथील लोकसंख्या सहाशेच्या वर असून कुकसा/गणेशपुर गट ग्रामपंचायत अस्तित्त्वात आहे, परंतू गणेशपुर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याअभावी भरपावसात एका मृतदेहाची अवहेलना झाली. या आठवड्यामध्ये गणेशपुर येथील एका वयोवृद्ध मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजातील इसमाचे आकस्मिक निधन झाले. त्यावेळी सकाळपासूनच संततधार पाऊस होता. स्मशानभूमीअभावी अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच नसल्याने अखेर कुटुंबाने गणेशपुर व केनवड या रस्त्यालगत असलेल्या केनवड येथील स्मशानभूमीतच अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर लगेच तीन चार दिवसानंतर रात्रीचे वेळेस दुसऱ्या समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला. परंतु स्मशानभूमीकडे जाण्याकरिता रस्ताच नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्यात आला. तालुक्यात खेडोपाडी अजूनही स्मशानभूमीकरीता प्रतीक्षा करावी आहे. सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा? असा प्रश्न पडतो. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पाऊस उघडल्यावर पुन्हा लाकडे टाकावी लागतात.

गणेशपुर येथे सात-आठ वर्षापासून स्मशानभूमी आहे. परंतु अद्याप त्या ठिकाणी एकही अंत्यसंस्कार पार पडला नाही, हे विशेष. त्याचे कारण स्मशानभूमीला रस्ताच नाही व सर्व बाजूला काटेरी झाडेझुडपे असून, स्मशानभूमी परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. अंत्यसंस्कारसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी सुविधा नाही. गावाजवळ असणाऱ्या स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य आहे. अवती भोवती काटेरी झाडी झुडपे वाढली आहेत. स्मशानभूमीत लाईटची सुविधा नाही, बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा नाही. अशा अनेक समस्यांच्या विळख्यात स्मशानभूमी असून अंत्यसंस्कार करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून स्वच्छतेसह इतर सुविधा स्मशानभूमीकडे जाण्याकरिता रस्ता, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

विकासाच्या बाता फोल

वाढती महागाई, रस्त्यातील खड्डे सर्वच समस्यांनी माणूस अक्षरश वैतागलाय. महत्वाच्या समस्या वर्षानुवर्ष सुटतच नाहीत, हे वास्तव असतानाच अखेरचा प्रवासही खडतर असल्याचे चित्र आहे. रिसोड तालुक्यातील अनेक वाड्यावस्तींना आजही स्वतंत्र स्मशानभूमी नाही. ज्या गावांसाठी स्मशाने आहेत, त्यातील बहुतेक स्मशाने बिकट अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकवेळा अंत्यसंस्कार भर पावसात करण्याचा प्रसंग ग्रामस्थांवर येतो. अंत्यसंस्कार करताना जोरदार पाऊस आल्याने विधीत अनेक अडथळे आले. असंख्य स्मशानभूमीची बिकट अवस्था पाहता स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही एक गांव, एक स्मशान, सुरक्षीत स्मशान मिळू शकलेले नाही. विकासाच्या बाता मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना आजही सुरक्षित स्मशान देता आलेले नाहीत. हे खेदजनक आहे.

स्मशान भूमी गणेशपुर गावासाठी आहे परंतु तिकडे जाण्याचा रस्ता नसल्याने मरणानंतर नरक यातना भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे काटेरी झुडपे व रस्त्यावर असलेली घाण तत्काळ साफ करण्यात यावी.

- दीपक पाटील शेवाळे, संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com