

अकोला : अंदुरा ग्रामपंचायतीच्या परिसरातील एका पुरातन इमारतीला विना परवानगी पाडून इमारतीचे सागवान ग्रामसेवकाने परस्पर विक्री करुन सात ते आठ लाख रुपयांचा अपहार केल्याचा मुद्दा मंगळवारी आयोजित स्थायी समितीच्या सभेत गाजला. त्यामुळे अंदुरा येथील ग्रामसेवक इंगळे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर यांनी लावून धरली.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभेत अंदुरा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इमारत अवैधरित्या पाडून त्या इमारतीतून निघालेले सागवान ग्रामसेवकाने परस्पर विक्री केल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी उपस्थित केला.
शासकीय इमारत पाडण्यासंदर्भात शासनाने नियम असताना सुद्धा सदर नियमांना बगल देत इमारत पाडण्यात आली, असे ते सभेत म्हणाले. त्यामुळे ग्रामसेवकावर नियमानुसार फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. यावर बाळापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (बीडीओ) यांनी स्पष्टीकरण द्यावे असे दातकर म्हणाले. स्पष्टीकरण देताना बीडीओ यांनी दोन दिवसापूर्वीच रूजू झाल्याचे सांगत प्रकरणाची माहिती घेवून स्पष्टीकरण देतो, असे सांगितले. अंदुरा येथील पाडण्यात आलेल्या इमारतीची नोंद ग्रामपंचायतच्या अभिलेखात नाही, त्यामुळे इमारत पाडण्यापूर्वी शासकीय नियमांचे पालन करण्यात आले नाही, असे वंचितचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने म्हणाले. परंतु सदर विषय गंभीर असल्याने ग्रामसेवकावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे दातकर यांनी केली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतीभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, सभापती पंजाबराव वडाळ, सभापती स्फूर्ती गावंडे, सभापती आकाश शिरसाट यांच्यासह इतर जिल्हा परिषद सदस्य, विविध विभागांचे अधिकार यांची उपस्थिती होती.
पदोन्नतीचा मुद्दा गुंडाळला
शिक्षण विभागाच्या थांबलेल्या पदाेन्नतीच्या मुद्दावर स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेचे गाेपाल दातकर यांनी प्रश्न उपस्थित केले. किती पदे रिक्त आहेत, प्रक्रिया का रखडली, असे सवाल करत माहिती सादर करण्याची मागणी त्यांनी केली. यावर विस्तार अधिकारी मनाकर यांनी सांगितले कि, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी या रजेवर असून, त्यांचा प्रभार माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे आहे. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी न्यायालयीन कामानिमित्त बाहेर गावी गेल्या आहेत. यावर माहिती कार्यालयातून मागविण्यात यावी, अशी मागणी दातकर यांनी केली. सदर माहिती सभागृहात सादर होण्यापूर्वीच सभा संपल्याचे अध्यक्षा प्रतिभा भाेजने यांनी जाहीर केले.
पाचपिंपळ ग्रा.पं.चा ठराव बारगळला
मनगा हद्दवाढीनंतर खरपमधील पाच पिंपळ हे गाव मनपामध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे ४०० लाेकसंख्या असलेले गाव हे अंधातरी आहे. या गावाला स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा देण्यात यावा, असा ठराव शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे सदस्य गाेपाल दातकर यांनी केली. वंचितचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी सदर ठराव वेळेवरच्या विषयात घेतल्यास शासन नामंजूर करू शकते, असे म्हणाले. सदर ठराव पंचायत विभागाकडे सादर झाल्यानंतर सुद्धा विभागाने रितसर सादर न केल्याने पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बाेटे यांच्यावर सदस्य आक्रमक झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.