
Akola : अतिवृष्टीमुळे सोयाबीनची वाढ खुंटली
शिरपूर : मध्यंतरी अतिवृष्टी व संततधार पावसामुळे या भागात असलेले मुख्य पीक सोयाबीनची वाढ खुंटली आहे. दरम्यान आता पुन्हा पावसाने ओढ दिल्याने फुले व शेंगा धरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन संकटात सापडले आहे. त्यामुळे सध्या शेतकरी पावसासाठी आसुसलेला असून शेतातील मातीस तडे पडत आहेत. शिवाय उन्हाच्या चटक्यांमुळे पिकेही माना टाकत आहेत, तेव्हा सोयाबीन पिकाचे उत्पन्न घटते की काय? अशी चिंता शेतकऱ्यांना लागून आहे.
शिरपूर व परिसरात सोयाबीन हे मुख्य नगदी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कपाशी हद्दपार झाल्यानंतर सोयाबीन या पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनाच्या भरवशावर शेतकरीवर्ग आपले वार्षिक बजेट लावत असतो, मात्र अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पावसाचा खंड यामुळे सदर पीक गत काही वर्षापासून संकटात येत आहे. यंदाही मध्यंतरी संततधार पाऊस होता त्यामुळे सूर्यदर्शन झालेच नाही. त्याने जमीन पूर्णतः ओली होती.
पर्यायाने सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असून लवकर येणाऱ्या सोयाबीन जातीच्या झाडांना सध्या शेंगा धरणे, दाणे भरण्याची अवस्था असून काही सोयाबीन पिके अतिउष्णतेमुळे मानाही टाकत आहेत. सुरुवातीला अतिवृष्टी तर आता पावसाचा खंड यामुळे या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सोयाबीन पिकासाठी पाऊस आवश्यक आहे तरच सोयाबीनची पिके सावरले जातील, अन्यथा पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीन पासून नुकसान सहन करावे लागेल.
निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर असून शिरपूर व परिसरात बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतामधील पिकाच्या भरोशावर त्याचे वार्षिक आर्थिक बजेट अवलंबून असते. त्यात मध्यंतरी महिनाभर झालेल्या संततधार पावसाने मूग, उडीद ही पिके गेली तर सोयाबीनची वाढ खुंटली तसेच या भागात असलेल्या हळद पिकाला देखील अति पावसाचा फटका बसला आहे. शिवाय पिकावर किडींचा प्रादुर्भाव असल्याने अधिक आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. निदान सध्या सर्वसाधारण पाऊस झाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व पिकांना जीवदान मिळेल.
यावर्षी सुरुवातीला अति पावसामुळे सोयाबीनच्या पिकाला फटका बसला. त्या संकटातून कसेबसे सावरत असताना सध्या शेंगा लागण्याच्या व दाणे भरण्याच्या संवेदनशील अवस्थेमध्ये परत पावसाने ओढ दिल्यामुळे परत उत्पादनात घट होण्याची चिन्हे आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची व्यवस्था आहे, त्यांनी संरक्षित ओलित करावे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विद्राव्य खताची मात्रा व फवारणी करून काही दिवस पीक दम धरून राहील यासाठी आपात्कालीन उपाय योजना करावी.
- डॉ गजानन ढवळे,प्रयोगशील शेतकरी, शिरपूर जैन